गाझियाबाद – समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी शनिवारी उत्तरप्रदेशप्रमाणेच गुजरातमध्येही सत्ताबदल होणार असल्याचे भाकीत केले. उत्तरप्रदेश निवडणुकीचा निकाल चकित करणारा नसेल. खरे आश्चर्य तर गुजरातमध्ये घडेल, असे त्यांनी म्हटले.
अखिलेश आणि राष्ट्रीय लोक दलाचे (रालोद) प्रमुख जयंत चौधरी यांची येथे संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यावेळी बोलताना अखिलेश म्हणाले, उत्तरप्रदेशच्या जनतेने याआधीच निकाल दिला आहे. सपच्या नेतृत्वाखालील आघाडीला सत्ता देण्याचा निर्णय शेतकरी, तरूण, व्यापारी आणि समाजाच्या सर्व घटकांनी घेतला आहे.
त्यामुळे उत्तरप्रदेशचा निकाल आश्चर्यकारक नसेल. चालू वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा निकाल खऱ्याअर्थी चकित करणारा ठरेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भाजपने अपमानित का केले? शेतकरी तो अपमान कसा विसरू शकेल, अशी विचारणा करत अखिलेश यांनी भाजपवर निशाणा साधला.
विधानसभा निवडणुकीसाठी सपने रालोद आणि इतर पक्षांना बरोबर घेऊन आघाडी स्थापन केली आहे. त्या आघाडीने सत्तारूढ भाजपपुढे कडवे आव्हान उभे केल्याचे चित्र आहे.