नवी दिल्ली – देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत. केरळमधील कोची येथे 2 सप्टेंबर रोजी आयएनएस विक्रांतच्या कमिशनिंगला पंतप्रधान प्रमुख पाहुणे असतील. याबाबत भारतीय नौदलाने नुकतीच माहिती दिली.
व्हाईस ऍडमिरल एसएन घोरमाडे म्हणाले, 2 सप्टेंबर हा ऐतिहासिक दिवस आहे. 40 हजार टन विमानवाहू युद्धनौका तयार करण्याची क्षमता असलेल्या जगातील सहा निवडक देशांच्या पंक्तीत भारत सामील झाला आहे. उर्वरित पाच देश अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि इंग्लंड आहेत. व्हाईस ऍडमिरलच्या मते, आयएनएस विक्रांतचा भारताच्या युद्ध ताफ्यात समावेश केल्याने इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांतता आणि स्थिरता राखण्यास मदत होईल.
विक्रांतवर 30 विमाने तैनात असतील. त्यापैकी 20 लढाऊ विमाने आणि 10 हेलिकॉप्टर असतील. सध्या विक्रांतवर मिग-29 के लढाऊ विमाने तैनात केली जातील. त्यानंतर टीईडीबीएफ म्हणजेच दोन इंजिन डेकवर आधारित फायटर जेट डीआरडीओ आणि एचएएलद्वारे तैनात केले जातील.
दरम्यान, अमेरिकेची एफ-18ए सुपर हॉर्नेट किंवा फ्रान्सची राफेल (एम) तैनात केली जाऊ शकते. या दोन्ही लढाऊ विमानांच्या चाचण्या सुरू झाल्या असून अंतिम अहवालानंतर कोणती लढाऊ विमाने तैनात करायची, याचा निर्णय घेतला जाणार आहे. यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासून विक्रांतवर मिग-29 लढाऊ विमाने तैनात करण्यास सुरुवात होणार आहे.
विक्रांतची वैशिष्टय
भारतातील सर्वात मोठी स्वदेशी युद्धनौका आयएनएस विक्रांतची केबल लांबी सुमारे 2,500 किमी आहे.विक्रांतची लांबी 262 मीटर, रुंदी 62 मीटर आणि उंची 59 मीटर आहे. विक्रांतचा फ्लाइट डेक दोन फुटबॉल मैदानांएवढा आहे, जिथून विमाने उडतील. या युद्धनौकेचा वेग 28 नॉट्स असून 7,500 नॉटिकल मैलांपर्यंत प्रवास करण्याची क्षमताही आहे. विमानवाहू नौकेत आठ पॉवर जनरेटर आहेत जे संपूर्ण कोची शहर उजळण्यास सक्षम आहेत. या विमानवाहू जहाजाच्या कॉरिडॉरची एक फेरी आठ किलोमीटर इतकी बसते. या युद्धनौकेत 2,300 कप्पे बनवण्यात आले असून, त्यात 1,700 जवान बसू शकतात.