नवी दिल्ली – “भारताचे सर्वोत्तम युग येत आहे, त्यामुळे आपण विकासासाठी स्वतः समर्पित केले पाहिजे,’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ते भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीच्या शेवटच्या दिवशी पक्षाच्या नेत्यांना संबोधित करताना बोलत होते.
पंतप्रधान पुढे बोलताना म्हणाले, “आपल्याकडे पुढील निवडणूकीसाठी 400 दिवस आहेत. आपल्याला लोकांच्या सेवेसाठी सर्व काही करायचे आहे, कारण आपल्याला इतिहास घडवायचा आहे. जो संकल्प करतो तोच इतिहास घडवतोत.’
पंतप्रधानांच्या आजच्या भाषणाबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात भारताचा सुवर्णकाळ येणार असल्याचे सांगितले. समाजाच्या सर्व घटकांशी जवळीक निर्माण करण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी कार्यकर्त्यांना केले. विकासकामांमध्ये आपली सर्व शक्ती खर्च करावी लागेल. पृथ्वी मातेची हाक ऐकायची आहे. पृथ्वी मातेला वाचवायचे आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
आपण कुशासनाकडून सुशासनाकडे कसे आलो आहोत, हा संदेश आपल्याला तरुणांपर्यंत पोहोचवायचा आहे. समाजातील सर्व घटकांशी संवेदनशीलतेने जोडले गेले पाहिजे. भाजपाला मतांची चिंता न करता देश आणि समाज बदलण्याचे काम करावे लागेल, असे पंतप्रधानांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आजचे पंतप्रधान मोदींचे भाषण प्रेरणादायी तसेच एक नवा मार्ग दाखविणारे असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आता पृथ्वी वाचवा मोहीम राबवा –
ज्या प्रकारे आम्ही बेटी वाचवा मोहीम यशस्वी केली, त्याच प्रकारे आपल्याला पृथ्वी वाचवा मोहीम राबवावी लागेल. खतांच्या अतिवापरामुळे हवामानातील बदल आणि पृथ्वीमातेवर होणारे परिणाम कमी करण्याची गरज आहे, असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.