नवी दिल्ली – भारतीयांनी अगोदरच हर्ड इम्युनिटी प्राप्त केली असल्यामुळे सध्या चीनमध्ये तशी परिस्थिती आपल्याकडे येणार नाही असे कोशिकीय आण्विक जैवविज्ञान केंद्र अर्थात सीसीएमबीचे वरिष्ठ अधिकारी विनय नंदीकुरी यांनी म्हटले आहे. सीसीएमबीचे संचालक असलेले नंदीकुरी पीटीआयशी बोलताना म्हणाले की, डेल्टा व्हेरियंट आला होता तेव्हा जेवढी गंभीर स्थिती निर्माण झाली होती तशी सध्या दिसत नाही. त्याचे कारण आपल्याकडे सामूहिक प्रतिकार शक्ती तयार झाली आहे.
डेल्टाच्या वेळी भीषण अवस्था होती. आपण लसीकरण मोहीम राबवली. त्यानंतर ओमिक्रॉनची लाट पाहिली. त्यावेळीही आपण खबरदारी घेणे सुरूच ठेवले. त्यामुळे अन्य देशांपेक्षा बऱ्याच प्रमाणात वेगळे आहोत. चीनमध्ये आता जे काही घडते आहे ते भारतात होणार नाही. चीनने शून्य कोविड निती अवलंबली होती. त्या देशात आता जो उद्रेक झाला आहे त्यामागचे हेही एक प्रमुख कारण आहे.
लसीकरणाचे प्रमाणही तेथे कमी होते. तेही एक कारण आहे. भारतात लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. ज्येष्ठांपासून अतिसंवेदनशील लोकसंख्या जी मानली जाते अशा सगळ्यांनाच लस दिली गेली आहे. अर्थात भारतात लाट येणारच नाही असा आपण दावा करू शकणार नाही. मात्र आता लगेचच ती येईल असे मानण्याचे कारण नाही.