काबूल : अफगानिस्तानात मागच्या काही दिवसांपासून युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे तिथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना पुन्हा सुरक्षित मायदेशी परत घेऊन येण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. उत्तर अफगानिस्तानात असलेल्या मजार ए शरीफ शहरातून दिल्लीसाठी एक विशेष विमान निघालं आहे. या विमानात मजार ए शरीफ आणि परिसरात राहणारे भारतीय नागरिकांना पुन्हा भारतात एअरलिफ्टकेलं जातं आहे. मजार ए शरीफमध्ये असलेल्या भारतीय दूतावासाने याबाबत माहिती दिली आहे.
भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या भारतीय नागरिकांना अफगानिस्तान सोडून भारतात परत यायचं आहे, त्यांनी तात्काळ आपलं पूर्ण नाव, पासपोर्ट क्रमांक (एक्सपायरी डेटसह) व्हाट्सअपवर पाठवण्याची सूचना केली आहे. यासाठी दूतावासाने 0785891303 आणि 0785891301 हे क्रमांकही जारी केले आहेत.
मागच्या काही दिवसांत तालिबान आणि अफगान सैन्यादरम्यान युद्ध सुरू आहे. त्यामुळे अफगानिस्तानात परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अमेरिकी सैन्यानं माघारी जाण्याची घोषणा केल्यानंतर तालिबानने अधिक आक्रमक रुप धारण केलं. अफगानिस्तानच्या वेगवेगळ्या भागांमध्ये रोज हल्ले होत आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगानिस्तानच्या मदतीसाठी आपले B-52 बॉम्बरसह अनेक फायटर जेट पाठवले आहेत, ज्यांच्या माध्यमातून तालिबानी तळांवर प्रत्युत्तरात हल्ले केले जात आहेत.
अफगानी सैन्याच्या प्रत्युत्तरानंतरही तालिबानी हार मानायला तयार नाहीत. दोन्ही बाजूंनी एकमेकांना आक्रमकपणे उत्तर दिलं जात आहे. मागच्या चार दिवसांत तालिबान्यांनी अफगानिस्तानातल्या 6 राज्यांच्या राजधान्यांच्या शहरांवर कब्जा केला आहे. अफगानी प्रशासनाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
अफगानिस्तानात तालिबान दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत आहे. आता इतर महत्वाच्या शहरांवर कब्जा केल्यानंतर तालिबान्यांनी आपला मोर्चा अफगानिस्तानातलं सर्वात मोठं शहर असलेल्या मजार ए शरीफकडे वळवला आहे. या भारात भारतीय नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या भागात राहणाऱ्या भारतीयांना त्याचा धोका वाढला आहे.
तालिबान बाल्ख, बदख्शां आणि पंजशीर प्रांतांवर कब्जा करण्याची तयार करत आहे. तालिबान कुंदुज एअरपोर्टजवळ पोहोचले आहेत. एअरपोर्टपासून फक्त 3 किमी अंतरावरचा परिसर आता तालिबान्यांच्या ताब्यात आहे. तालिबान्यांना हळूहळू संपूर्ण अफगानिस्तान देश गिळंकृत करायचा आहे. त्यामुळे तालिबान्यांना हकलवून लावण्यासाठी ऑपरेशन क्लियरन्स हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत तालिबान्यांच्या तळांवर सातत्यानं हल्ले केले जात आहेत.