काबुल – अफगाणिस्तानात कुनार नदीवर बांधण्यात येत असलेले धरण पाकिस्तानच्या डोकेदुखीचे कारण ठरते आहे. अफगाणिस्तानातील तालिबान सरकार देशातील नद्यांच्या पाण्यांचे योग्य नियोजन करण्याच्या योजनेवर काम करते आहे. सर्वसामान्य नागरिकांना याचा लाभ व्हावा हा त्यांचा यामागचा उद्देश आहे. याच योजने अंतर्गत एका धरणाचेही बांधकाम सुरू करण्यात आले आहे.
याच कामामुळे अगोदरच तणावात असलेले पाकिस्तान- अफगाणिस्तान संघर्ष अधिक ताणले जाण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानातील कुनार नदी पुढे जाऊन काबूल नदीला जाउन मिळते. तेथून पुढे ती पाकिस्तापर्यंत जाते. आता जर नदीवर धरण बांधले गेले तर पाकिस्तानला पाणी टंचाईची भीती सतावते आहे.
तालिबान सरकारच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अफगाणिस्तानातील जो अत्यंत कोरडा भाग आहे तेथे शेतीला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने देशातील कुनार, फरियाब, फराह आणि हेमलँड या मुख्य नद्यांच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे केल्याने संपूर्ण देशाला त्याचा लाभ होणार आहे. ४८० किमी लांब असलेली कुनार नदी ही काबुल नदीला पूरक अशी नदी आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानच्या कुनार धरण प्रकल्प योजनेचा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील राजनैतिक संबंधांवर प्रभाव पडतो आहे. आपल्याला भासणारी पाणी टंचाई दूर करण्यासाठी काबुलचा हा निर्णय पाकिस्तानसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. कुनार नदीवर बांधण्याचा एकतर्फी निर्णय हे शत्रुत्वाची कृती असल्याचे पाकिस्तानचे मानणे आहे. तर पाकिस्तान धरणामुळे निर्माण होणाऱ्या प्रभावाबद्दल तिखट मीठ लावून आरडाओरड करत असल्याचे अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
हे अगदी छोटेसे धरण असणार आहे आणि त्याचा पाकिस्तानला मिळणाऱ्या पाण्यावर कोणताही प्रभाव पडणार नाही. उलट पावसाळ्यात पाणी रोखून धरण्याचे काम या धरणामुळे होणार असल्यामुळे पूरस्थितीच्या वेळी पाकिस्तानला याची मदतच होणार आहे. पूराची तिव्रता कमी होण्यास याची त्यांना मदतच होईल आणि अंतिमत: ते त्यांच्याच हिताचे असेल.
दरम्यान, रेडीओ आझादीशी बोलताना अफगाणिस्तानचे जलतज्ज्ञ नजीबुल्लाह सादीद म्हणाले, पाकिस्तानी अधिकारी धरणाच्या संदर्भात उगाच अवास्तव माहिती देत आहेत. हे एक छोटेसे धरण आहे आणि ते केवळ वीजनिर्मितीसाठी बांधले जाते आहे. त्यात अगदी थोडे पाणी साठवले जाणार आहे. राजकीय विश्लेषक सईद मसूद यांच्या म्हणण्यानुसार कुनार धरण हे एक आर्थिक- राजनैतिक धरण आहे.
ते अफगाणिस्तानला आर्थिक दृष्ट्या सशक्त बनवण्यासाठी बांधले जाते आहे. काबुल नदी आणि तिच्या सहायक नद्या या अफगाणिस्तानसाठी पाण्याचा मुख्य स्त्रोत आहेत. त्या शेतीसाठी पाण्याची उपलब्धता करून देतात. स्थानिकांची पिण्याच्या पाण्याची गरज त्यामुळे भागते. तसेच देशवासियांच्या एकूणच उपजीविकेसाठीही हातभार लावतात.
काय आहे कटुतेची कारणे?
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात गेल्या काही काळापासून बिनसले आहे. त्याकरता अनेक कारणे आहेत, तथापि, सगळ्यांत महत्वाचे कारण म्हणजे नोव्हेंबर महिन्यात पाकिस्तानने त्यांच्या देशात आश्रयाला असलेल्या अफगाणि नागरिकांची हकालपट्टी करण्यासाठी काढलेले फर्मान. यामुळे पाकिस्तानात वास्तव्याला असणाऱ्या १७ लाखांपेक्षा अधिक शरणार्थींना अफगाणिस्तानात परत जावे लागणार आहे.
या एकाच निर्णयामुळे दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला आहे. अर्थात डुरांड रेषेवरून दोन्ही देशांमध्ये खूप जुना वाद आहे. १८९३ मध्ये तत्कालीन ब्रिटिश सरकारने आखलेली २६७० किमीची डुरांड रेषा अफगाणिस्तानला अमान्य आहे. ही फाळणी अगदी पक्षपातीपणे झाली असल्याचे अफगाणिस्तानचे म्हणणे आहे. या सीमेवर काही टोळ्याही राहतात. ते स्वत:ला पाकिस्तानचे नाहीतर अफगाणिस्तानचे नागरिक मानतात.