नवी दिल्ली : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी नेता हरदीप निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केला होता, त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव चांगलाच पेटल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील संबध ताणले गेले आहेत. अमेरिका व ऑस्ट्रेलियाने कॅनडाची बाजू घेतलेली असताना भारताकडून कॅनडाच्या सर्व आरोपांचे खंडन करण्यात आले आहे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची हकालपट्टी केलेली असताना आता भारतानं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
खलिस्तानी समर्थक हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणावरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर गंभीर आरोप केल्यानंतर या सर्व प्रकरणाला सुरुवात झाली. या आरोपानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने मोठा निर्णय घेत कॅनडातील भारताची व्हिसा सेवा तात्पुरती बंद केली आहे. त्यासोबतच पुढील सूचना मिळेपर्यंत ही सेवा स्थगित असेल, अते कॅनडातील व्हिसा केंद्राच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
“Important notice from Indian Mission: Due to operational reasons, with effect from 21 September 2023, Indian visa services have been suspended till further notice. Please keep checking BLS website for further updates,” reads a notification on the official website of ‘India Visa… pic.twitter.com/eJSqPjJ513
— Press Trust of India (@PTI_News) September 21, 2023
भारतातून कॅनडामध्ये जाणाऱ्या व कॅनडातून भारतात येणाऱ्या असंख्य भारतीय व कॅनेडियन नागरिकांना या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जून महिन्यात हरदीप सिंग निज्जरची हत्या करण्यात आल्यानंतर त्यावरून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला. भारताच्या कॅनडातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टीही केली. यावर भारतानंही हे आरोप फेटाळताना कॅनडाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टी केली.
दोन्ही देशांनी एकमेकांच्या नागरिकांना विशेष सूचना जारी केल्या. या पार्श्वभूमीवर भारताने कॅनडातील व्हिसा सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून व्हिसा केंद्राच्या संकेतस्थळावर ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे. भारताच्या या निर्णयामुळे पुन्हा दोन्ही देशातील संबंध ताणले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.