नवी दिल्ली : देशात यास चक्रीवादळाने ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांना मोठा फटका बसला आहे. तर वादळामुळे झालेल्या नुकसानीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई पाहणी केली. मात्र, त्यानंतर झालेल्या मोदी यांच्या आढावा बैठकीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अर्धा तास उशिराने पोहोचल्या. त्यामुळे पंतप्रधानांना वाट बघावी लागली. त्यानंतर ममतांना झालेल्या विलंबावरून भाजपा नेत्यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली. याच टीकेला आता तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी भाजपाला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे .
भाजपाकडून होत असलेल्या टीकेला तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी उत्तर देत पलटवार केला. महुआ मोईत्रा यांनी एक ट्विट करत भाजपावर टीकास्त्र डागलं. “३० मिनिटं उशीर झाल्याच्या कथित विलंबावरून इतका गोंधळ? भारतीय सात वर्षांपासून १५ लाख रुपयांची वाट बघताहेत. लोक एटीएमबाहेर तासन् तास वाट बघत आहेत. लशीसाठी अनेक महिन्यांपासून वाट बघत आहेत. कधी कधी थोडी प्रतीक्षा तुम्हीही करा,” असे म्हणत महुआ मोईत्रा यांनी केंद्र सरकार आणि भाजपाला उत्तर दिले आहे.
So much fuss over an alleged 30 min wait?
Indians waiting 7 years for ₹15 lakhs
Waiting hours at ATM queues
Waiting months for vaccines dueThoda aap bhi wait kar lijiye kabhi kabhi…
— Mahua Moitra (@MahuaMoitra) May 28, 2021
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला सत्तेत येऊन तीन आठवडे उलटत नाही, तोच राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे. काही दिवसांपूर्वीच तृणमूल काँग्रेसचे मंत्री आणि आमदारांना सीबीआयने अटक केल्यावरून ममतांनी केंद्रावर आगपाखड केली होती.
‘चक्रीवादळाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व राज्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी अनुपस्थित राहणे हे कृत्य उद्धटपणाचे आणि अविचारी असून मुख्यमंत्र्यांची वर्तणूक हा शिष्टाचार आणि संघराज्यवादावरील आघात आहे,” असे केंद्र सरकारने ममतांनी केलेल्या विलंबावरून म्हटले होते. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही ममतांवर निशाणा साधला होता.