लंडन – भारतीय संघाचे फलंदाज जागतिक किर्तीचे असले तरीही ते स्विंग गोलंदाजीसमोर ढेपाळतात, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कुक याने व्यक्त केले आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला याचेही मूळ कारण स्विंगसमोर आलेले अपयशच आहे. कर्णधार विराट कोहलीसह संघातील अन्य फलंदाजांनीही स्विंग चेंडूला कसे सामोरे जायचे याचा सरावच केलेला नसल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे आगामी इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतही भारतीय संघ यशस्वी होईल असे मला वाटत नाही, असेही कुक म्हणाला.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका ऑगस्ट महिन्यापासून सुरू होत आहे. इंग्लंडमध्ये ऑगस्ट महिन्यात खेळपट्टी थोडीशी ओलसर राहते, त्यामुळे चेंडू चांगलाच स्विंग होतो. भारतीय संघात चांगले फलंदाज आहेत. पण चेंडू जेव्हा स्विंग होतो, तेव्हा त्याचा समर्थपणे सामना भारतीय फलंदाजांना करता येत नाही.
भारतीय संघाची ही कमकुवत बाजू आहे. त्यामुळे इंग्लंडच्या गोलंदाजांसाठी ही मालिका जिंकणे कठीण नाही. इंग्लंडकडे चांगले स्विंग गोलंदाज आहेत आणि त्यामुळेच भारतीय फलंदाजांना इंग्लंडमध्ये फलंदाजी करणे आव्हानात्मक असेल, असेही त्याने सांगितले.