लंडन – इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचा नवोदित फलंदाज शुभमन गिल याने आपली दुखापत खुद्द कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, सपोर्ट स्टाफ व निवड समिती या सगळ्यांपासून लपवून ठेवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता गिलसमोरच्या अडचणी वाढणार असून, त्याला बीसीसीआयकडून अंतर्गत कारवाईलाही सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत गिल न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात खेळला. मात्र, हा सामना पार पडल्यावर लगेचच गिलला दुखापत झाल्याचे सांगण्यात आले. मुळातच गिलला आपल्या दुखापतीबद्दल माहिती होती, तर तो इंग्लंडला गेलाच कसा. भारतीय संघाचे कर्णधार, प्रशिक्षक, फिटनेस तज्ज्ञ यांच्यापासून त्याने ही गोष्ट का लपवली. तसेच त्याने निवड समितीलाही त्याची कल्पना दिली नाही. हे अत्यंत गंभीर असून संघातील जागा जाईल या भीतीने आता खेळाडू आपल्या दुखापतीही लपवू लागले आहेत. याबाबत आता बीसीसीआयने जास्त लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असे मत निवड समितीचे माजी अध्यक्ष व माजी क्रिकेटपटू साबा करीम यांनी व्यक्त केले आहे.
गिलने त्याची दुखापत लपवायला नको होती. त्याने त्याच्या दुखापतीबद्दल फिजियो आणि वैद्यकीय पथकाला सांगायला हवे होते. संघ व्यवस्थापनालाही ही गोष्ट कशी लक्षात आली नाही. सराव सत्रात प्रत्येक खेळाडू पूर्ण फिट आहे किंवा नाही हे लक्षात येते. म्हणजे सराव सत्रात सपोर्ट स्टाफ उपस्थित तरी होता का, असा सवालही करीम यांनी उपस्थित केला आहे.
श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारताच्या दुसऱ्या संघातील पृथ्वी शॉ याला इंग्लंडला बोलावले जाणार, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यावरही करीम यांनी ताशेरे ओढले आहेत.
मुळात इंग्लंडमध्ये असलेल्या भारतीय संघात मयंक आग्रवाल व लोकेश राहुल हे सलामीवीर असताना शॉ याला पाचारण करण्याचे कारणच काय. या दोघांनाही अनुभव आहे, त्यांनी परदेशातही कसोटी सामने खेळले आहेत. शॉ याला बोलावून संघात खेळवायचे हे कोणी ठरवले. निवड समितीला बाजूला ठेवून हे निर्णय कोण घेत आहे हे समोर आले पाहिजे, असेही करीम यांनी म्हटले आहे.
तिसऱ्या सलामीवीराची गरज काय – कपिल
भारताचा प्रमुख संघ इंग्लंडमध्ये आहे. संघात राहुल व आग्रवाल असताना पुन्हा तिसरा सलामीवीर श्रीलंकेतून बोलावण्याची गरज नाही. या दोन खेळाडूंवर संघ व्यवस्थापनाला विश्वास नाही का, जर तसे असेल तर त्यांना मुळातच संघात का निवडले गेले. निवड समितीने जो संघ निवडला आहे, त्यांच्याकडूनच सरस कामगिरी करून घेण्याची जबाबदारी कर्णधाराची असते. कर्णधार कोहलीचाच या दोघांवर विश्वास नाही का, निवड समितीचा आदर राखा त्यांच्या निर्णयाला डावलून स्वतः निर्णय का घेतले जात आहेत, असा सवाल भारताचे महान गोलंदाज व माजी कर्णधार कपिल देव यांनी केला आहे.