ओटावा (कॅनडा) – कॅनडामध्ये २०१९ साली झालेल्या प्रांतीय आणि २०२१ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भारत आणि पाकिस्तानने मिळून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कॅनडाच्या गुप्तहेर संघटनेने केला आहे. कॅनडीयन सिक्युरीटी इंटिलिजन्स सर्व्हिसने एका अहवालामध्ये हा आरोप केला असल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे.
२०१९ आणि २०२१ च्या निवडणुकांमध्ये चीन, भारत, रशिया आणि अन्य देशांकडून हस्तक्षेप झाल्याच्या शक्यतेचा तपास करण्यासाठी एक आयोग नियुक्त करण्यात आला होता. त्या आयोगाच्या अहवालाचा एक भाग प्रसिद्ध करण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तानने कॅनडाच्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता, असे या अहवालात म्हटले आहे.
मात्र भारताने या अहवालातील दावा पूर्णपणे बिनबुडाचा असल्याचे सांगून सपशेल फेटाळला आहे. उलट कॅनडाकडूनच भारताच्या अंतर्गत व्यवहारांमध्ये हस्तक्षेप केला जात असल्याचे म्हटले आहे. भारताकडून कॅनडामधील गेल्या दोन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केला जात असल्याच्या शक्यतेचा तपास केला जात असल्याचे माध्यमांनी म्हटले आहे.
२०२१ मध्ये भारताने कॅनडातील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्याच्या उद्देशाने काही गुप्त कारवाया केल्या असाव्यात. भारत सरकारने कॅनडामध्ये गुप्त एजंट घुसवले असावेत, असे या अहवालात म्हटले आहे. कॅनडातल्या निवडणुकांमध्ये भारतधार्जिण्या उमेदवारांच्या मदतीसाठी अवैधपणे अर्थसहाय्य करून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असावा.
हे आर्थिक सहाय्यया उमेदवारांच्याही नकळत केले गेले असावे. भारतीय वंशाचे मतदान खलिस्तानवादी उमेदवार आणि पाक पुरस्कृत भूमिकेला अनुकूल असल्याचे गृहित धरून हा हस्तक्षेप केला गेला असावा, असे या अहवालात म्हटले आहे. दोन वर्षांपूर्वी २०१९ मध्ये पाकिस्ताननेही कॅनडाच्या प्रांतीय राजकारणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता, असेही या अहवालात म्हटले आहे.
हे नुसते आरोप असून या संदर्भात ठोस पुरावा हाती लागलेला नाही. पुराव्यासाठी आणखीन सखोल तपास आवश्यक असल्याचे सीएसआयएसचे संचालक डेव्हिड विग्नेल्ट यांनी चौकशी दरम्यान म्हटले होते. या संदर्भातील कागदपत्रे अप्रमाणित, एकाच स्रोतातील किंंवा अपुरी असल्याचेही ते म्हणाले होते.
चीनच्या कारवायांचा इतिहास बघता विदेशी हस्तक्षेपाची सार्वजनिक चौकशी गेल्या आठवड्यापासून सुरू झाली. मात्र उपलब्ध झालेल्या कागदपत्रांच्या आधारे भारत आणि पाकिस्तानच्या हस्तक्षेपाची शक्यताही पडताळून बघितली जाते आहे.
उलट कॅनडाकडूनच भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप…
कॅनडाच्या माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या या वृत्ताची भारताने दखल घेतली आहे. कॅनडातील निवडणुकांमध्ये भारताकडून हस्तक्षेप केला जात असल्याचे या अहवालातील सर्व आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आहेत.
अन्य देशांच्या लोकशाही प्रक्रीयेमध्ये हस्तक्षेप करण्याचे भारताचे धोरण कधीच नाही. उलट भारताच्या अंतर्गत व्यवहारांमध्ये कॅनडाकडूनच हस्तक्षेप केला जात असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैयस्वाल यांनी फेब्रुवारीतच म्हटले आहे.