दुबई – अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झालेल्या दुबईतील भारतीयांच्या मदतीसाठी तेथील भारतीय दूतावासाने मदतीचा हात पुढे केला आहे. अमिराती प्रशासन आणि विमानसेवेशी नियमित संपर्क ठेवला जात असून भारतीयांनी दूतावासाच्या संपर्कात रहावे, असे आवाहन दूतावासाच्यावतीने करण्यात आले आहे.
पूरामुळे ताटातूट झालेल्या कुटुंबांना एकत्र आणण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. दुबईत कार्यरत भारतीयांच्या संघटनेच्या माध्यमातून पूराचा फटका बसलेल्यांना मदत पुरवली जाते आहे, असे भारतीय दूतावासाने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दूतावासाने मदतीसाठी हेल्पलाईन देखील सुरू केली असून जोपर्यंत सर्व परिस्थिती पूर्ववत होत नाही, तोपर्यंत ही हेल्पलाईन सुरू ठेवण्यात येणार असल्याचेही दूतावासाने म्हटले आहे.
अतिवृष्टीमुळे दुबईच्या बहुतेक भागामध्ये पूरस्थिती आहे. तसेच महामार्ग, रेल्वे आणि विमानसेवा खंडीत झाली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन अतिवृष्टीमुळे संयुक्त अरब अमिरातीच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
आगामी काही दिवस दुबई, अबूधाबी आणि शारजामध्ये मुसळधार पावसाची शक्यता राष्ट्रीय हवामानशास्त्र संस्थेने वर्तवली आहे. सोमवारी रात्री संपूर्ण अमिरातीमध्ये गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते मध्यम पाऊस झाला.
प्रतिकूल हवामानाची ही परिस्थिती बुधवारी सकाळपर्यंत कायम राहण्याची अपेक्षा आहे, किनारपट्टीच्या भागात पाऊस आणि विजा चमकतील. विशेषतः देशाच्या उत्तर आणि पूर्वेला ही स्थिती कायम असेल, असा असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.