नवी दिल्ली -मोदी सरकारने देश प्रथम हे धोरण राबवले. त्याउलट, कुटूंब प्रथम असे कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील आधीच्या यूपीए सरकारचे धोरण होते. यूपीए सरकारने देशाला गंभीर स्थितीत नेऊन ठेवले, असे टीकास्त्र केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी सोडले.
देशाच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित श्वेतप्रत्रिका लोकसभेत सादर करण्यात आली. त्यावरील चर्चेचा प्रारंभ करताना सीतारामन यांनी मोदी सरकारवर स्तुतिसुमने उधळतानाच मागील यूपीए सरकारवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला.
यूपीए सरकार सत्तेत असताना २००८ यावर्षात जागतिक आर्थिक पेचप्रसंभ उद्भवला. आमच्या सत्ताकाळात करोना संकट उद्भवले. मात्र, पेचप्रसंग प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने हाताळल्यास परिणामही चांगले मिळतात ते आमच्या सरकारने दाखवून दिले. दोन्ही सरकारांच्या कामगिरीची तुलना श्वेतपत्रिकेत आहे.
मोदी सरकारने देशाला जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये नेऊन ठेवले आहे. आपला देश जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे, असे त्या म्हणाल्या. यूपीए राजवटीतील विविध घोटाळ्यांमुळे देशाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचा आरोपही त्यांनी केला.