नवी दिल्ली : ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपमध्ये सन्मान आणि समाधान मिळणार नाही. त्यांना लवकरच त्याची जाणीव होईल, असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरूवारी म्हटले.
माजी केंद्रीय मंत्री आणि प्रभावी तरूण नेते असणाऱ्या ज्योतिरादित्य यांनी कॉंग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावरून कॉंग्रेस नेत्यांनी ज्योतिरादित्य यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. मात्र, प्रदीर्घ काळापासून मित्र असणाऱ्या ज्योतिरादित्य यांच्याविषयी प्रतिक्रिया देताना राहुल यांनी सौम्य भाषा वापरली.
ज्योतिरादित्य आणि मी कॉलेज जीवनापासून एकत्र होतो. त्यांच्याशी माझा संवाद होतच राहील. त्यांची विचारसरणी मला ठाऊक आहे. राजकीय भवितव्याच्या चिंतेमुळे विचारसरणी बाजूला ठेऊन ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघासमवेत गेले, अशी टिप्पणी राहुल यांनी संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना केली.
अर्थव्यवस्था, करोनावरून मोदी सरकारवर टीकास्त्र
अर्थव्यवस्थेची हाताळणी आणि करोनाचा मुकाबला या मुद्द्यांवरून राहुल यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. शेअर बाजारात काय घडतेय ते आपण पाहतोय. मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था उद्धवस्त केली आहे. आपण केवळ त्सुनामीची सुरूवात पाहतोय. स्थिती आणखी बिघडण्याची चिन्हे आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थव्यवस्थेबाबत एक शब्दही बोलत नाहीत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना अर्थव्यवस्था समजतच नाही, अशी खिल्ली त्यांनी उडवली. करोनामुळे अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. आता उशीर झाला असला तरी नुकसान कमी करण्यासाठी मोदी सरकारने पाऊले उचलावीत, असेही राहुल यांनी म्हटले.