धर्मशाळा – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज येथे होत आहे. न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय तसेच कसोटी मालिकेत व्हाइटवॉश स्वीकारलेला भारतीय संघ मायदेशात होत असलेली ही मालिका जिंकण्यात यशस्वी होणार का, हा आता प्रश्न निर्माण झाला असून अंतिम 11 खेळाडूंची निवड करताना कर्णधार विराट कोहलीची तारांबळ उडणार आहे.
न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघाने 5 टी-20 सामन्यांची मालिका निर्विवाद जिंकून यजमानांना व्हाइटवॉश दिला होता, मात्र, यजमान न्यूझीलंड संघाने त्या पराभवाचा वचपा काढताना भारतीय संघाला एकदिवसीय तसेच कसोटी मालिकेत व्हाइटवॉश दिला होता. दुखापतीने संघाबाहेर असलेला सलामीवीर शिखर धवन संघात परतला असून तोच डावाची सुरुवात करेल. त्याला भरात असलेला लोकेश राहुल साथ देईल हे स्पष्ट झाले असले तरी मधल्या फळीत कोणाला संधी द्यायची याची डोकेदुखी कोहलीलाच दूर करावी लागणार आहे.
कोहलीचा सूर सध्या हरपला असल्याने मनीष पांडे, श्रेयस अय्यर यांच्यावर मधल्या फळीत दमदार खेळ करण्याची जबाबदारी राहणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत जायबंदी झाल्याने सलामीवीर रोहित शर्माने मालिकेतून माघार घेतली होती, तो अद्यापही तंदुरुस्त ठरलेला नसल्याने त्याच्या जागी पृथ्वी शॉ याचा संघात समावेश करण्यात आला आहे. अर्थात तो कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार हे स्पष्ट झालेले नाही. मयांक आग्रवालला वगळण्यात आल्याने आणि कोहलीची बॅट शांत असल्याने भारतीय फलंदाजी कमकुवत बनली आहे.
दुखापतीतून सावरलेला हार्दिक पंड्या याने मुंबईतील डी. वाय. पाटील क्रिकेट लीगमध्ये धडाकेबाज कामगिरी केल्याने तोच या मालिकेत भारताचे ट्रम्प कार्ड ठरणार आहे. भारतीय फलंदाजीबाबत बोलायचे झाले तर राहुल व पंड्या यांनाच संघाला मोठी धावसंख्या उभारून द्यावी लागणार आहे. परदेशात ढेर आणि मायदेशात शेर असे वर्षानुवर्षे प्रचलित असलेले समीकरण याही मालिकेत सार्थ ठरविण्यात भारतीय संघ यशस्वी होतो का हे पाहणे लक्षवेधी ठऱणार आहे. राहुलचा सूर पाहता त्यालाच धवनसह
संघाला सुरुवात करून द्यावी लागणार आहे.
भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव, शुभमन गिल.