बालासोर – भारताने मध्यम पल्ल्याच्या आणखी एका क्षेपणास्त्राची बुधवारी यशस्वी चाचणी घेतली. जमिनीवरून हवेत मारा करू शकणारे ते क्षेपणास्त्र (एमआरएसएएम) ओडिशाच्या किनारपट्टीलगत असणाऱ्या तळावरून डागण्यात आले.
जमिनीवरील मोबाईल लॉंचरवरून प्रक्षेपित करण्यात आलेल्या क्षेपणास्त्राने अचूक लक्ष्यभेद केला. चाचणीवेळी बन्शी हे मानवरहित विमान (यूएव्ही) हवेत सोडण्यात आले. त्यावर काही क्षणांत क्षेपणास्त्राने नेमकेपणाने मारा केला.
चाचण्या पूर्ण झाल्यानंतर ते क्षेपणास्त्र भारतीय लष्करात दाखल केले जाईल. त्यामुळे संरक्षण दलांच्या मारक क्षमतेत आणखी भर पडेल. यशस्वी चाचणीचे सर्व मापदंड पूर्ण करणारे संबंधित क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) इस्त्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीजच्या मदतीने विकसित केले आहे.
भारत डायनॅमिक्स लि.कंपनीने त्या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे. संबंधित क्षेपणास्त्र 70 किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्यावर मारा करू शकते.