म्हणून रिलायन्स जिओची केली निर्मिती
मुंबई – याअगोदर कृषी, औद्योगिक आणि माहिती तंत्रज्ञान क्रांतीत भारत आगेकूच करू शकला नाही. आता चौथ्या औद्योगिक क्रांतीत भारत पुढच्या फळीत राहावा, यासाठी रिलायन्स जिओ कंपनी विकसित करण्यात आली असल्याचे या कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे.
कृषी आणि औद्योगिक क्रांतीवेळी आपण पारतंत्र्यात होतो. त्यामुळे जगात समृद्धी निर्मितीसाठी झालेल्या या बदलात आपल्याला सहभागी होता आले नाही. माहिती तंत्रज्ञान क्रांतीवेळी मात्र भारत या क्रांतीत बऱ्याच प्रमाणात सहभागी झाला असला तरी या क्रांतीचे नेतृत्व करू शकला नाही.
जिओ येण्याअगोदर भारतातील दूरसंचार क्षेत्र 2 -जी तंत्रज्ञानात अडकले होते. 2-जी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी 25 वर्ष लागली. मात्र रिलायन्स जिओने 4- जी नेटवर्क केवळ तीन वर्षात भारतीयांना उपलब्ध केले. याचा भारतीय जनता पुरेपूर वापर करून घेत असून सध्या सर्वात जास्त हायस्पीड डेटा भारत वापरत आहे. भारताने या क्षेत्रात केलेली प्रगती अभूतपूर्व आहे.
चौथी औद्योगिक क्रांती कशी असेल
चौथ्या औद्योगिक क्रांतीत डिजिटल आणि भौतिक तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण होणार आहे. त्यामध्ये क्लाऊड कॉम्प्युटिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज, स्मार्ट उपकरणे, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, ब्लॉकचेन, ऍग्युमेंन्टेड रिऍलिटी, व्हर्चुअल रिऍलिटी इत्यादी तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. या तंत्रज्ञानाचा भारतातील नागरिकांना वापर करता यावा याकरिता जिओने हाय स्पीड डेटा, किफायतशीर उपकरणे उपलब्ध केली आहेत. त्यामुळे भारत चौथ्या औद्योगिक क्रांतीत मागे पडणार नाही, असे मुकेश अंबानी म्हणाले.