INDIA Rally Cancelled : आगामी लोकसभा निवडणुच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जी इंडिया आघाडी बनवली आहे. त्या आघाडीविषयी महत्वाची माहिती समोर येत आहे. दिल्लीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी दोन दिवसांपूर्वी झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत इंडिया आघाडीची सभा घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र आता आघाडीची भोपाळमध्ये होणारी पहिली सभा अचानक रद्द करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.
दोन दिवसापूर्वी पार पडलेल्या समन्वय समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत काँग्रेस महासचिव के.सी.वेणूगोपाल यांनी जाहीर केले होते की, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळ इथं इंडिया आघाडीची पहिली सभा घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने विरोधक या सभेतून लोकसभेचे रणशिंग फुंकणार अशी चर्चा सुरु झाली होती. पण अचानक ही सभा न घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कमलनाथ यांनी सांगितले असल्याचे सांगण्यात येत आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलं की, “पक्षाच्या प्रमुखांनी अद्याप इंडिया आघाडीच्या भोपाळमधील रॅलीबाबत निर्णय घेतलेला नाही. पण यावर एकदा निर्णय झाल्यानंतर लवकरच तुम्हाला कळवण्यात येईल”
दरम्यान, मध्य प्रदेशात ‘सनातन धर्म’ वादाविरोधात भाजपच्या जनआक्रोश मोर्चा निघणार आहे. या मोर्चाला घाबरुन इंडिया आघाडीनं भोपाळमध्ये होणारी आपली पहिली सभा रद्द केल्याचे मध्य प्रदेश भाजपने म्हटले आहे. पण प्रत्यक्षात ही सभा रद्द होण्याचं कारण वेगळचं असताना भाजपने आपल्या मोर्चामुळे ती रद्द झाल्याचा प्रोपोगंडा सुरु केला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.