टी-20 ची निर्णायक लढत आज पुण्यात रंगणार : सेकंड बेंच पर्यटकच राहणार का?
पुणे : श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा व अखेरचा सामना आज येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यासह आणखी एक मालिका जिंकण्याची भारतीय संघाला संधी आहे, मात्र आगामी विश्वकरंडक स्पर्धा लक्षात घेता संघातील सेकंडबेंचला खेळविण्याचा प्रयोग होणार का? हे खेळाडू केवळ पर्यटक म्हणूनच राहणार हा खरा प्रश्न आहे.
संजू सॅमसन व मनीष पांडे या खेळाडूंना गेल्या काही महिन्यांपासून संघात निवडले तर जात आहे पण प्रत्यक्ष सामना खेळण्याची संधीच त्यांना मिळालेली नाही. एकीकडे ऑस्ट्रेलियात ऑक्टोबरमध्ये होणारी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवत नवोदितांना संधी देण्याची मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री व कर्णधार विराट कोहली यांनी केलेली घोषणा वल्गनाच राहणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या नोव्हेंबरपासून सातत्याने संघात निवड झालेल्या सॅमसनला अद्याप एकही सामना खेळायला मिळालेला नाही. यष्टीरक्षक ऋषभ पंत सातत्याने अपयशी होत असतानाही सॅमसनला न खेळविण्यामागे खरे कारण काय आहे हे देखील गुलदस्त्यात आहे.
दुसरीकडे गेल्या तीन मालिकांमध्ये संघात वर्णी लागलेल्या मनीष पांडेलाही प्रत्यक्ष संघात खेळविले गेलेले नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विश्वकरंडक स्पर्धा समोर ठेवून नवोदितांना संधी देण्याचे निवड समितीचे धोरण असल्याचे जाहीर केले होते, मात्र शास्त्री व कोहली तसेच निवड समिती प्रत्यक्षात मात्र सेकंडबेंचला खेळविण्याबाबत गंभीर असल्याचे दिसलेले नाही.
शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, श्रेयस अय्यर, शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर यांना खेळविले गेले त्यांना सातत्याने संधीही देण्यात येत आहे मात्र मग सॅमसन व पांडेबाबतच हा प्रयोग का होत नाही असाही प्रश्न पडलेला आहे. एखादा खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर गेला तर तो जेव्हा तंदुरुस्त ठरेल तेव्हा त्याला संघात थेट स्थान दिले जाते मग त्याच्या जागी संघात स्थान मिळवून सरस कामगिरी केलेल्या खेळाडूला वगळण्यात येते याबाबतही आश्चर्य व्यक्त होत आहे.
दुसरीकडे लसित मलिंगाच्या नेतृत्वाखाली खेळत असलेला श्रीलंका संघही संघबांधणीच्या प्रक्रियेतून जात आहे. त्यातच इसुरु उदानाला झालेली दुखापत संघासाठी मोठा फटका ठरत आहे. अँजलो मॅथ्युजच्या संघात परतण्याने त्यांची फलंदाजी भक्कम झाल्याचे कागदावर दिसत असले तरी गुवाहाटीतील सामन्यांत त्यांनी केलेली फलंदाजी त्यांच्यासाठी चिंतेचा विषय बनली आहे.
पहिला सामना पावसाने वाया गेला होता, तर गुवाहाटीचा सामना जिंकून भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारतीय संघ आजचा सामना जिंकून आणखी एक मालिका खिशात घालण्यासाठी सज्ज आहे, तर दुसरीकडे हा सामना जिंकून प्रतिष्ठा राखण्यासाठी श्रीलंकेला अत्यंत कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे, तसेच त्यांना जबाबदारीने खेळ करावा
लागणार आहे.
बंगळुरचे तीन खेळाडू संघात कसे?
इंडियन प्रीमिअर लीगमधील (आयपीएल) कोहली कर्णधार असलेल्या रॉयल चॅलेंजर बंगळुर संघातील तीन खेळाडू एकाच वेळी भारतीय संघात कसे हा देखील एक प्रश्न आहे. नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर व शिवम दुबे यांना संघात स्थान दिले जाते मग सॅमसन व पांडे यांच्याबाबत प्रशिक्षक व कर्णधार प्रयोग का करत नाहीत असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.