डॉ. मेघश्री दळवी
जागतिक पातळीवर अनेक प्रश्नांचा सामना आपण करतो आहोत. भविष्याच्या दृष्टीने त्यातला एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे अन्न सुरक्षेचा. जगात अन्नधान्याचं उत्पादन वाढतं आहे. पण आज ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे, त्या प्रमाणात आपण सर्वांना अन्न पुरेल अशी व्यवस्था करू शकू का? तीही ग्लोबल वॉर्मिंगमध्ये भर न घालता, वातावरणातील ग्रीनहाऊस वायूंचं प्रमाण न वाढवता आणि जगाची सरासरी तापमानवाढ आयपीसीसीने ठरवून दिलेल्या मर्यादेच्या आत राखून?
अन्नधान्य उत्पादन वाढवताना आपण काही धान्याचं संकरित जाती आणल्या, काहींसाठी जनुकीय बदल केलेली जीएम बियाणं आणली. त्यातून नैसर्गिक अन्नसाखळीवर निश्चितच परिणाम झाला. धान्याच्या काही महत्त्वाच्या मूळ जाती नाहीशा झाल्या किंवा दुर्मिळ झाल्या. आज हवामान बदलाचे परिणाम वेगाने जाणवू लागले आहेत. पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे. बेभरवशाच्या हवामानात पीक घेणं शेतकऱ्याला कष्टकारक होत आहे. अन्नाच्या पुरवठ्यावर आणि किमतीवर या सगळ्याचा प्रचंड प्रभाव दिसू लागला आहे. एका अंदाजानुसार येत्या तीस वर्षांत अन्नधान्य उत्पादन तीस टक्क्यांनी घसरणार आहे. त्यामुळे आजच्या धान्याच्या मुख्य संकरित जातींसोबत इतर विस्मरणात गेलेल्या जातींचं आणि खाद्यबियांचं महत्त्व अधोरेखित होऊ लागलं आहे. भविष्यातील अन्नसुरक्षेसाठी या जाती मिळवणं, जगवणं, टिकवणं अत्यावश्यक आहे हे आता हळूहळू लक्षात येत आहे.
सुमारे शंभर शास्त्रज्ञांचा चमू गेली सहा वर्षे या प्रश्नावर काम करत आहे. पंचवीसहून अधिक देशांमध्ये फिरून त्यांनी भाजी, फळं, आणि धान्याच्या दुर्मिळ जाती पुन्हा मिळवल्या आहेत. त्यात बांबारा शेंगदाणे, ग्रासपी, बाजरीसारख्या वन्य धान्यांच्या जाती, अशा आगळ्या पिकांचा समावेश आहे. ही पिकं नेहमीच्या पिकांसोबत घेत गेलं तर आपलं अन्नाचं वैविध्य वाढेल. गहू, तांदूळ, मका यापलीकडे इतर धान्य आपण खाऊ लागलो तर वाढत्या लोकसंख्येला पुरेसे अन्न मिळू शकेल.
आज जगात केवळ एकाच प्रकारची, कॅव्हेंडिश जातीची केळी मोठ्या प्रमाणावर पिकवली जातात. उद्या या जातीवर रोग पडला, तर जगात केळ्यांचा प्रचंड तुटवडा पडेल. म्हणून केळ्याच्या सुमारे पन्नास वेगवेगळ्या जातींचं संवर्धन करण्याचं संशोधन आता होत आहे. वांग्याच्या असंख्य रानटी जाती आहेत, पण आपण केवळ चार-पाच प्रकारच खातो. तेही बदलून सर्व प्रकार आपल्या खाण्यात येतील हा प्रयत्न सुरू होतो आहे. थोडक्यात, आपण पुन्हा एकदा जुन्या पद्धतीच्या खाण्याकडे वळणार आहोत.
सुदैवाने भारतात खाण्यात कमालीचं वैविध्य आहे. छोट्या शेतांमध्ये, बागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळं आणि भाज्या अजूनही होत असतात. रानभाज्या, रानमेवा हौशीने खाल्ला जातो. धान्यातही निरनिराळे प्रकार घेतले जातात. आता जाणीवपूर्वक अधिक वैविध्य आणणं हे उद्याच्या अन्नसुरक्षेच्या दृष्टीने योग्य पाऊल होईल.