नवी दिल्ली : जगात भारतात सर्वाधिक रस्ते अपघात आणि मृत्यूंचे प्रमाण आहे. 2019 या वर्षात भारतात तब्बल 2,35,929 रस्ते अपघात झाले आणि त्यामध्ये 92,837 व्यक्ती मरण पावल्या. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडील ही माहिती आहे. आपल्या देशातील अपघातातील मृतांचे प्रमाण हे 39.34 टक्के इतके आहे.
अऩेक ठिकाणी अपघाती वळण किंवा अपघाती जागा म्हणून फलक असतात. मात्र ते वळण सरळ करण्यासाठी किंवा अपघात का होतात हे जाणून उपाययोजना करण्याकडे कमी कल असतो. रस्ते अपघाताच्या आणि त्यात मृत्यू पावलेल्यांच्या बातम्या रोजच वर्तमानपत्रात येत असतात. अर्थात सगळ्याच बातम्या येतात असे नव्हे. जागतिक बँकेकडील आकडेवारी आणखी भीषणता दाखवते.
बँकेने 2019 मध्ये एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. रस्ते सुरक्षा संधी आणि उपाय – कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांची स्थिती, असे या अहवालाचे लांबलचक नाव आहे. रस्ते अपघातातील मृतांचे आणि जखमींचे प्रमाण लक्षात घेतले तर भारत जगात प्रथम स्थानी असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
जगातील एकूण वाहनसंख्येच्या तुलनेत भारतात फक्त एक टक्का वाहने आहेत आणि असे असतानाही जगातील वाहन अपघातांच्या तुलनेत जगभरातील रस्ते अपघतात मरण पावलेल्यांची संख्या लक्षात घेतली तर त्यातील 11 टक्के मृत्यू हे भारतातील असतात. भारतात दर तासाला 53 रस्ते अपघात होतात आणि दर चार मिनिटाला एकाचा अपघातात मृत्यू होत असतो, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारतात दरवर्षी सरासरी 4.5 लाख रस्ते अपघात होतात. त्यामध्ये सरासरी 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो. रस्ते अपघतातील नुकसानीमुळे भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) दरवर्षी 3.14 टक्क्यांनी घट येते. केवळ रस्ते बांधून आणि शहरे एकमेकांशी जोडून पुरेसे नाही तर तज्ज्ञांच्या मते अधिकारी, कायदा अंमलबजावणी करणाऱ्या संस्था, कंत्राटदार आणि अन्य संबंधित घटकांनी एकत्रितपणे महामार्गावरील प्रत्येक अपघाताचे वैज्ञानिक विश्लेषण केले पाहिजे आणि त्यामागील कारण जाणून घेतले पाहिजे. त्यातून अचूक धोरणे, चालकांचे शिक्षण केले पाहिजे, जेणेकरून भयानक रस्ते अपघातांची संख्या कमी करता येईल.
अपघातांची किती किंमत मोजावी लागते?
उपचारांचा वैद्यकीय खर्च, मृत्यू किंवा जखमी झाल्याने बुडणारे उत्पन्न, मृत व्यक्तीची भविष्यातील कमाई, वाहनाचे नुकसान आणि अन्य प्रशासकीय खर्च लक्षात घेतला तर रस्ते अपघातातील प्रत्येक मृतामागे सरासरी 91.16 लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागते. प्रत्येक जखमी व्यक्तीमागे हे नुकसान सरासरी 3.64 लाख रुपये एवढे असते. किरकोळ जखमी झाल्यामुळे होणारे नुकसान हे सरासरी 77,938 रुपये इतके असते.
रस्ते की मृत्यूचे सापळे
(2019 मधील आकडे, स्त्रोत – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय)
भारतातील एकूण रस्त्यांच्या जाळ्यापैकी राष्ट्रीय महामार्ग फक्त 2 टक्के आहेत आणि याच महामार्गांवर देशातील एकूण रस्ते अपघातांपैकी 30.06 टक्के अपघात होतात आणि रस्ते अपघातातील मृत्यूंपैकी 35.7 टक्के मृत्यू राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातात होतात.
एकूण रस्त्यांच्या जाळ्यापैकी राज्य महामार्ग फक्त 3 टक्के आहेत आणि त्यावर 24.3 टक्के अपघात होतात. राज्य महामार्गांवर देशातील एकूण रस्ते अपघातातील मृत्यूंपैकी 25.5 टक्के मृत्यू होतात.
राष्ट्रीय व राज्य महामार्ग वगळता अन्य रस्त्यांचा विचार केला तर ते 95 टक्के आहेत आणि त्यावर एकूण अपघातांपैकी 45 टक्के अपघात होतात आणि 39 टक्के मृत्यू होतात.