लाहोर – भारत (India) चंद्रावर पोचला आहे आणि “जी-20′ परिषदेचे यशस्वी आयोजनही केले आहे. तर पाकिस्तान (Pakistan) जगापुढे भीक मागतो आहे, अशा सब्दात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ (Nawaz Sharif) यांनी देशातल्या राजकारण्यांना घरचा आहेर दिला आहे. देशाच्या विकलांगझालेल्या आर्थिक स्थितीला देशाच्या माजी लष्करी हुकूमशहा आणि न्यायाधीशांना शरीफ यांनी दोष दिला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानची आर्थिक स्थिती खिळखिळी झाली आहे. देशातील महागाईचा दर दोन आकडी संख्येपर्यंत पोचला आहे. त्यामुळे देशातील सामान्य जनतेवर पडणारा ताण आता सहन होण्यापलिकडे गेला आहे.
भारत चंद्रावर पोचला. भारताने “जी-20’परिषदेचे (G20 Conference) आयोजनही केले. हे यश पाकिस्तान मिळवू शकत नाही. याला कोण जबाबदार आहे? असा प्रश्न शरीफ यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना लंडनवरून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करताना उपस्थित केला.
भारतात 1990 मधील सरकारांनी सुरू केलेल्या आर्थिक सुधारणा भारताने अनुसरल्या आहेत. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले होते. तेंव्हा भारताकडे केवळ एक अब्ज डॉलर शिल्लक राहिले होते. मात्र आता भारताची विदेशी गंगाजळी 600 अब्ज डॉलरवर पोचली आहे.
भारत कोठे पोचला आहे आणि पाकिस्तान काय करतो आहे, असे शरीफ म्हणाले. या स्थितीबद्दल 2017 मध्ये पंतप्रधान पदावरून पायउतार होण्यास भाग पाडणाऱ्या लष्करी आणि न्यायालयीन व्यवस्थेला शरीफ यांनी जबाबदार धरले आहे.