अहमदाबाद – भारताला चीन किंवा पाकिस्तानची जमीन नको आहे, आम्हाला सीमेवर केवळ शांतता हवी आहे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. गुजरातसाठीच्या जनसंवाद रॅलीत नागपुरमधून बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. ते म्हणाले की भारताने कधीही भुतान आणि बांगलादेशचीही जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला नाही. शेजारील देशांशी मैत्री व बंधुभावानेच वागण्याचा आमचा सतत प्रयत्न राहिला आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
मोदी सरकारने गेल्या वर्षभराच्या काळात केलेल्या कार्याची माहिती देऊन ते म्हणाले की या सरकारने बाह्य व अंतर्गत पातळीवरही देश सुरक्षित ठेवण्याचे काम केले आहे. देशातील माओवाद्यांची समस्या जवळपास संपुष्ठात आली असून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादालाही आमच्या सरकारने पायबंद घातला आहे.
भारताच्या एका बाजुला चीन आहे आणि दुसऱ्या बाजुला पाकिस्तान आहे, पण आम्ही कायमच शांततेची आणि अहिंसेची अपेक्षा केली आहे. तथापि अहिंसा ही शक्तीवानालाच शोभून दिसते अशी टिपण्णीही त्यांनी एक संदर्भ देऊन केली.
विस्तारवादी भूमिका घेऊन आम्हाला भारत मजबूत करण्याची इच्छा नाही असे नमूद करून ते म्हणाले की, आम्हाला शेजारील देशाच्या एक इंच जमीनीचीही अपेक्षा नाही. सध्याच्या करोना समस्येचा उल्लेख करून ते म्हणाले की ही समस्या फार काळ राहणार नाही. त्यावर लस शोधण्यासाठी देशातील आणि जगाच्या अन्य भागातील वैज्ञानिक दिवस रात्र प्रयत्न करीत आहेत. माझ्या माहितीनुसार आपल्याला ही लस लवकरच सापडेल मग आपल्याला या समस्येची चिंता उरणार नाही असे ते म्हणाले.