INDIA Alliance Sabha In Mumbai: – काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईत समारोप होत आहे. इंडिया आघाडीचं शिवतीर्थावर शक्ती प्रदर्शन सुरू आहे. देशातील सर्व विरोधी पक्षांचे प्रमुख नेते शिवाजी पार्कवर उपस्थित आहेत. यावेळी भाजप एक फुगा, ज्यात आम्हीच हवा भरली, असं म्हणत शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.
आता त्यांच्या डोक्यात हवा गेलीय…
उध्दव ठाकरे म्हणाले की, भाजप एक फुगा आहे. मला वाईट याचं वाटतं की, या फुग्यात हवा भरण्याचं काम आम्हीच केलं होतं. संपूर्ण देशात भाजपचे दोन खासदार होते. त्या फुग्यात आम्ही हवा भरली, अन् आता त्यांच्या डोक्यात हवा गेलीय. काय त्यांची स्वप्न. 400 पार जागा म्हणजे काय फर्निचरचं दुकान आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
भाजपच्या फुग्यात हवा भरण्याचं काम आम्हीच केलं, नि आता त्यांच्या डोक्यात हवा गेलीय. pic.twitter.com/tkCB62JsQ2
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) March 17, 2024
भाजपचा नारा ‘अबकी बार 400 पार’ असा आहे, पण यांना 400 पार का हवंय? संविधान बदलण्यासाठी, देशाचं नाव बदलण्यासाठी यांना ‘400 पार’ हवंय, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “भाजपला 400 पार कशासाठी पाहिजे. यांचे मंत्री म्हणतात आम्हाला घटना बदलायची आहे, म्हणून 400 पार पाहिजे. आज आपल्यासमोर एक वेळ घेऊन ठेवली आहे. देश हाच माझा धर्म, देश वाचला तरच आम्ही वाचू. व्यक्तीची ओळख देश झाली पाहिजे देशाची ओळख व्यक्ती नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.”
त्यावेळी हुकूमशहाचा अंत होतो….
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘कोणीही राज्यकर्ता अमर पट्टा घेऊन येत नाही. या देशाच्या जनतेसमोर हुकूमशाही कितीही मोठी असला, ज्यावेळेस सर्व लोक एकवटात त्यावेळी हुकूमशहाचा अंत होतो. आज ती वेळ आलेली आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आपला इतिहास थोडा फोडा आणि राज्य करा असा असेल, त्यामुळे आपल्या मध्ये जो फूट पाडतोय त्याला थोडा फोडा आणि त्याच्या छाताडावर राज्य करा अशी सांगायची वेळ आलेली आहे.’
दरम्यान, मुंबईतील भारत आघाडीच्या या रॅलीत सर्व घटक पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या रॅलीत काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा, शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार, पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, आरजेडी नेते तेजस्वी यादव, वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर व इतर नेते सहभागी झाले आहेत.