Shashi Tharoor – भाजप-विरोधकांची “इंडिया’ (India Aghadi) आघाडी ही लोकहिताच्या कामालाच प्राधान्य देईल. नेत्यांच्या प्रतिमा जपण्याचा कसलाही अट्टाहास न करता, सर्वसामान्यांचे हित जपण्यासच आघाडीचे प्राधान्य असेल, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि थिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी केले आहे.
मिझोरम निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत थरूर म्हणाले की, विधानसभा निवडणुकांसाठी जाणाऱ्या पाचही राज्यांमध्ये कॉंग्रेस पक्ष भाजपपेक्षा पुढे आहे. त्यामुळे पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी आघाडीचे मनोबल वाढेलेले असेल.
भारतीय मतदारांनी मोदींची प्रतिमा किंवा भाजपची जनसंपर्क यात्रा नव्हे तर, आपल्या हिताचे काय काम केले आहे, हे विचारण्याची वेळ आली आहे. लोक कल्याणाला प्राधान्य देणारे सरकार तुम्हाला हवे आहे का? नेत्याची प्रतिमा न ठेवता जनतेला प्राधान्य देणारे सरकार हवे आहे का? तसे असेल तर मतदारांपुढे “इंडिया’ आघाडी हाच एकमेव पर्याय आहे.
थरूर म्हणाले, ‘खरं सांगायचं तर असं दिसतंय की भारतीय मतदार भाजपला कडक संदेश देण्याच्या तयारीत आहे. निवडणुकांवर नजर टाकली तर सध्या भाजप पाचपैकी चार राज्यांमध्ये कॉंग्रेसपेक्षा खूपच मागे आहे आणि राजस्थानमध्ये थोडासा मागे आहे.
म्हणून या निवडणुकांच्या निकालांनंतर पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होत असताना विरोधकांना मोठी ताकद मिळणार आहे. आणि भाजपसाठी ही चांगली बातमी असू शकत नाही.
राजस्थान, मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या पाच राज्यांमध्ये 7 ते 30 नोव्हेंबर दरम्यान मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी सर्व राज्यांमधील मतमोजणी होणार आहे.