हर्षवर्धन पाटलांचा खडा सवाल : लोकप्रतिनिधींची निष्क्रियता
रेडा- इंदापूर तालुक्यात कोविड रुग्णांची संख्या 1150 पर्यंत पोहचली आहे. यात 46 मृत्यू ही चिंतेची बाब आहे. राज्यात मृत्यूचा दर हा केवळ 2.5 ते 3 टक्क्यांच्या आत असताना इंदापूर तालुक्यात मात्र मृत्यूचा दर 4 टक्के इतका जास्त का? असा सवाल भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला. या मृत्यूमध्ये केवळ ऑक्सिजन, व्हेंटिलेटर न मिळाल्याने 30 ते 32 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी नमूद केले.
तालुक्यात करोना रुग्णांच्या मृत्यूचा दर हा जास्त असणे म्हणजे लोकप्रतिनिधी असलेल्या मंत्र्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये अपयश आले आहे, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. चार महिन्यांपूर्वी मी इंदापूर तालुका हा हॉटस्पॉट होईल, असा जाहीर इशारा दिला होता. त्यानुसार शासनाने सुविधांची उपलब्धता करावी, अशी मागणी केली होती. त्यावेळी नियोजन झाले असते तर आज मृत्यूची संख्या वाढली नसती, असे त्यांनी ठामपणे सांगितले. सध्याच्या लोकप्रतिनिधींना परिस्थितीचे गांभीर्य नाही. जबाबदारीची जाणीव नाही. फक्त आश्वासने दिली जातात, असेही त्यांनी सांगितले.
इतर तालुक्यांमध्ये करोना रूग्णांसाठी चांगल्या सुविधा आहेत. मंग इंदापूर तालुक्याला मंत्रिपद असूनही चांगल्या सुविधा का नाहीत. सध्या जनताही भयभीत झाली आहे. ऑक्सिजन, व्हेंटीलेटर बेडच्या आरोग्य सुविधा शासनाकडून मिळत नाहीत. बाहेरच्या शहरातही रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. त्यामुळे जनतेला दिलासा कोण देणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
ते म्हणाले की, इंदापूरचे लोकप्रतिनिधी हे रुग्णांवर तातडीने उपचाराचे योग्य व्यवस्थापन करण्यामध्ये निष्क्रिय ठरत आहेत. वैद्यकीय साधनांची तसेच डॉक्टर व स्टाफची टंचाई, रुग्णाच्या मृत्यूनंतर नातलगांना होणारा त्रास, याकडे कोणाचे लक्ष नाही. कोविड सेंटरमध्ये अद्यापि अनेक गैरसोयी आहेत. लोकप्रतिनिधींनी बैठकांमध्ये घोषणा करण्याऐवजी रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदी सुविधा उपलब्ध करून देण्याकडे लक्ष द्यावे. जनतेने सध्या मिळणाऱ्या असुविधांचा मुद्दा कोठे मांडायचा? आम्ही विरोधासाठी बोलत नाही तर वस्तुस्थिती मांडत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. जनतेचा शासन, प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही. आता स्वतःचे व कुटुंबाचे संरक्षण हे स्वतःलाच करावे लागणार आहे, या मानसिकतेत जनता आहे.