IND vs ENG 5th Test (Dharamsala) : सध्या सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना धरमशाला येथे खेळवला जात आहे. या मालिकेत भारतीय संघाने 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. आता रोहित शर्मा आणि कंपनीची नजर पाचव्या कसोटीवर आहे.
भारताविरुद्ध प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडने जॅक क्रॉलीच्या अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या डावात 218 धावा केल्या. या 26 वर्षीय फलंदाजाने भारताविरुद्ध 11 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने सर्वाधिक 79 धावा केल्या.
प्रत्युत्तरात भारताने रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या शतकी खेळीच्या जोरावर दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात आठ गडी गमावून 473 धावा केल्या. सध्या कुलदीप यादव 27 धावांवर आणि जसप्रीत बुमराह 19 धावांवर नाबाद आहे. अशा स्थितीत टीम इंडियाची आघाडी 255 धावांवर पोहोचली आहे.
टॉप-5 फलंदाजांनी केली विशेष कामगिरी…
या कसोटीतील उल्लेखनीय बाब म्हणजे भारताच्या आघाडीच्या फळीतील सर्व फलंदाजांनी पहिल्या डावात अर्धशतकी खेळी खेळली. भारताच्या टॉप-5 ( Rohit Sharma, Shubman Gill, Devdutt Padikkal, Sarfraz Khan, Yashasvi Jaiswal ) फलंदाजांनी 15 वर्षांनंतर हा पराक्रम करून दाखवला. इंग्लंडविरुद्ध यशस्वी जयस्वालने 57 धावा, रोहित शर्माने 103 धावा, शुभमन गिलने 110 धावा, देवदत्त पडिक्कलने 65 धावा आणि सर्फराज खानने 56 धावा केल्या. भारताच्या टॉप-5 (प्रथम पाच) फलंदाजांनी अर्धशतकी खेळी खेळून इतिहास रचला.
याआधी टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरने (प्रथम पाच फलंदाज) तीनदा 50 पेक्षा जास्त धावा करण्याची कामगिरी केली आहे. भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलिया (1998), न्यूझीलंड (1999) आणि श्रीलंका (2009) विरुद्ध पन्नास किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.