लंडन – कर्णधार बेन स्टोक्स आणि प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्या बॅजबॉल या योजनेशी जुळवून घेताना प्रमुख फलंदाज ज्यो रूट आपला नैसर्गिक खेळच विसरला आहे, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूकने व्यक्त केले.
कूकच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने २०१२ मध्ये भारतात कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली होती. सध्या सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात रूटने १० चेंडूंत १६ धावा केल्या. तो कधीच स्वत:चा नैसर्गिक खेळ करत आहे असे वाटले नाही. प्रत्येक चेंडू मारण्याचा त्याचा प्रयत्न होता, असे कूक म्हणाला.
दुसऱ्या कसोटीत भारताच्या ३९९ धावांच्या आव्हानासमोर इंग्लंडचे अधुनिक बॅजबॉलचे नियोजन कुचकामी ठरले. रूट हा अलीकडच्या काळातील इंग्लंडचा सर्वोत्तम फलंदाज आहे. मात्र, बॅजबॉलच्या दडपणाखाली तो धडपडताना दिसत आहे, असे कूकचे म्हणणे आहे.
रूटने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत जवळपास ११,५०० धावा केल्या आहेत. आता बॅजबॉलच्या नियोजनात बसण्यासाठी तो खूप उत्सुक आहे. मात्र, आक्रमण आणि बचावाचा समतोल साधताना रूट त्याची नैसर्गिक शैली विसरतो की काय अशी भीती वाटत आहे. जलदगतीने धावा करण्यापेक्षा रूटने त्याच्या नैसर्गिक शैलीने खेळायला हवे. दुसऱ्या कसोटीत दुसऱ्या डावात रूटने प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. ही त्याची शैली नाही, असेही कूक म्हणाला.