लंडन :- जसप्रीत बुमराची अफलातून गोलंदाजी हाच भारत आणि इंग्लंड या संघांमधील मुख्य फरक होता. बुमराच्या भेदक माऱ्यामुळेच भारताला दुसरा कसोटी सामना जिंकता आला. इंग्लंडने वेळेवर खेळ उंचावण्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर ही मालिका ते निश्चितच गमावतील, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने व्यक्त केले.
विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत बुमराने दोन डावांत मिळून नऊ गडी बाद केले. विशेषत: पहिल्या डावात त्याने उत्कृष्ट गोलंदाजी करताना ४५ धावांत इंग्लंडच्या सहा फलंदाजांना माघारी धाडले. त्याने यॉर्करचा सुरेख वापर केला. त्याच्या कामगिरीमुळे भारताने दुसरा सामना जिंकत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. बुमराची कामगिरी हाच दोन संघांमधील मुख्य फरक होता. त्याने दुसऱ्या डावात तीन बळी मिळवले. मात्र, पहिल्या डावात सपाट खेळपट्टीवर त्याने केलेली गोलंदाजी फारच अप्रतिम होती. त्याने सहा बळी मिळवताना इंग्लंडला २५३ धावांत गुंडाळले आणि त्यानंतर इंग्लंडला पुनरागमन करणे शक्य झाले नाही, असे हुसेन म्हणाला.
इंग्लंडच्या पहिल्या डावात बुमराने जशी गोलंदाजी केली, त्याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. त्याची गोलंदाजीची शैली वेगळी आहे. चेंडू टाकताना त्याच्या शरीराचा भार डावीकडे अधिक असतो. त्यामुळे फलंदाजाला चेंडू खेळताना अडचण येते. त्यातच चेंडू रिव्हर्स स्विंग होत असल्यास बुमरासमोर खेळणे कठीण बनते, असेही हुसेन म्हणाला.
इंग्लंडने खेळ उंचावणे गरजेचे
दुसऱ्या कसोटीतील विजयानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ उर्वरित तीन कसोटीत अधिक दर्जेदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. अशात इंग्लंडने आपला खेळ उंचावणे गरजेचे आहे.पहिल्या दोन कसोटीत भारतीय संघाला आपल्या काही अनुभवी खेळाडूंविना खेळावे लागले. महंमद शमी संपूर्ण मालिकेला मुकणार आहे. रवींद्र जडेजा पुढील कसोटीत खेळण्याची शक्यताही कमी आहे. विराट कोहलीही पहिल्या दोन्ही कसोटीत खेळला नाही. हे सर्व भारतासाठी फार महत्त्वाचे खेळाडू आहेत. कोहली आणि लोकेश राहुल यांचे पुढील सामन्यात पुनरागमन होऊ शकेल. त्यामुळे भारताची ताकद वाढेल. उर्वरित तीन सामन्यांत त्यांचेच पारडे जड असेल. त्यामुळे इंग्लंडने आपला खेळ उंचावणे गरजेचे आहे, असे हुसेन म्हणाला.
बुमराहला मिळणार ब्रेक
भारताने इंग्लंडला दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभूत करत पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. आता येत्या १५ तारखेपासून तिसरा कसोटी सामना सुरु होत आहे. दुसऱ्या सामन्यात भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावणारा गोलंदाज जसप्रीत बुमराह याला या सामन्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते असे संकेत मिळत आहेत. निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने बुमराहला राजकोट कसोटीत विश्रांती देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. शेवटच्या दोन कसोटीत त्याला खेळवण्याचा विचार सुरू आहे. असे झाले तर महंमद सिराज पुन्हा संघात परतेल. दुसऱ्या सामन्यात सिराज खेळला नव्हता. दुसऱ्या कसोटीत बुमराहने ९ गडी बाद केले होते. त्यालाच सामन्याचा मानकरी घोषित करण्यात आले होते.
तिसऱ्या कसोटीसाठी संभाव्य संघ – यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, रजत पाटीदार किंवा विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, श्रीकर भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्सर पटेल, मुकेश कुमार, महंमद सिराज.