चेन्नई – चेन्नईच्या एमए चिदंबरम अर्थात चेपॉक स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघात आजपासून दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या दिवसाखेर 88 षटकात 6 बाद 300 धावा केल्या आहेत. भारताकडून रोहित शर्माने दिडशतकी, तर अजिंक्य रहाणेने अर्धशतकी खेळी करत हा दिवस गाजवला.
भारताच्या डावाची सुरूवात खुपच निराशाजनक ठरली. सलामीवीर शुबमन गिलच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला. यानंतर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराची जोडी डावास चालना देत होती. परंतु पुजाराला झेलबाद करत जॅक लीचने त्यांची भागिदारी मोडली. पुजारानंतर कर्णधार विराट कोहलीही स्वस्तात बाद झाला.
इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अलीने 21.2 षटकात विराटला त्रिफळाचित केले. मोईनच्या फिरकी चेंडूवर कव्हर ड्राइव्हला शॉट मारण्याचा प्रयत्नात शून्यावर विराटची दांडी उडाली. विराटची बाद झाल्यानंतर भारताची 22 षटकात 3 बाद 86 धावा अशी अवस्था झाली.
दुसरीकडे रोहितने संयमी खेळी करत डावातील 14.4 षटकात जॅक लीचच्या चेंडूवर खणखणीत चौकार मारत अर्धशतकाला गवसणी घातली आहे. या खेळीसाठी त्याने 47 चेंडूंत 1 षटकार आणि 8 चौकार ठोकले. रोहित आणि रहाणेने भक्कम फलंदाजी करताना दुसऱ्या सत्रानंतर इंग्लंडच्या फलंदाजांना 73 षटकापर्यंत यश मिळू दिले नाही. या दोघांनाही काही चांगल्या चेंडूवर इंग्लंडच्या गोलंदाजांनी बीट केले. मात्र ते त्यांना बाद करण्यात अपयशी ठरत होते.
दरम्यान, 68व्या षटकात जो रुट गोलंदाजी करत असताना रोहितने दिडशतक पूर्ण केले. रोहितने 208 चेंडूत 16 चौकार आणि 2 षटकारांसह त्याची दीडशतकी खेळी केली. भारतात कसोटीमध्ये 150 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याची रोहितची ही चौथी वेळ ठरली.
मात्र, रोहित दिडशतक पूर्ण करताच 73व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोईन अली विरुद्ध स्विपचा फटका मारण्याच्या नादात जॅक लीच करवी झेलबाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर रिषभ पंत फलंदाजीसाठी आला आहे. रोहितने 231 चेंडूत 161 धावा केल्या. यात त्याने 18 चौकार आणि 2 षटकार मारले.
भारताकडून पहिल्या दिवसाखेर रिषभ पंत 56 चेंडूत 33 धावांवर नाबाद आहे. तर अक्षर पटेल 7 चेंडूत 5 धावांवर नाबाद आहे. इंग्लंडकडून पहिल्या दिवसाखेर जॅक लीच आणि मोईन अलीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ऑली स्टोनने 1 विकेट घेतली.
रोहित बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणेने पंतला साथीला घेत डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र रहाणेला मोईन अलीने 76व्या षटकात त्रिफळाचीत केले. रहाणे 149 चेंडूत 67 धावा करुन बाद झाला. त्यानंतर काही वेळात आर. अश्विनही 19 चेंडूत 13 धावांवर जो रुटने टाकलेल्या चेंडूवर झेलबाद झाला. डावाच्या 83 व्या षटकात ऑली स्टोनने त्याचा झेल घेतला. यानंतर मात्र पंतने काहीसे आक्रमक खेळ केला. तसेच अक्षर पटेलला साथीला घेत भारताचा डाव पुढे नेला.