IND vs ENG 3rd Test (Day 1) Live Cricket Score : आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना खेळवला जात आहे. मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. हैदराबादमधील पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली आणि विशाखापट्टणममधील दुसरी कसोटी भारतीय संघाने जिंकली. आता तिसरी कसोटी जिंकून टीम इंडिया मालिकेत आघाडी घेण्यासाठी मैदानात उतरली आहे. हा सामना राजकोटमध्ये खेळला जात आहे.
IND vs ENG Live: सरफराज धावबाद, जडेजाचे शतक….
भारतीय संघाला 314 धावांवर मोठा आणि पाचवा धक्का बसला. रवींद्र जडेजाच्या शतकाच्या पाठलागात शानदार फलंदाजी करणारा सरफराज खान धावबाद झाला. वास्तविक, जडेजा 99 धावांवर होता. यानंतर डावाच्या 82व्या षटकात अँडरसनच्या चेंडूवर जडेजाने मिडऑनला फटका खेळला. जडेजाने सर्फराजला सिंगलसाठी बोलावलं आणि दोन पावलं पुढे सरकला पण नंतर परत माघारी परतला. यावेळी सर्फराज अर्ध्या खेळपट्टीवर पोहोचला होता. अशा परिस्थितीत त्याच्याकडे परतायला वेळच उरला नव्हता. मार्क वुडने डायरेक्ट थ्रो करत सर्फराजला धावबाद करण्यात कोणतीच चूक केली नाही आणि सरफराज खानच्या तुफानी खेळीचा अंत झाला.
सरफराज फलंदाजीला आला तेव्हा जडेजा 153 चेंडूत 84 धावा करून फलंदाजी करत होता. यानंतर सरफराजने 66 चेंडूंत नऊ चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 62 धावांची खेळी केली, तर जडेजाने 16 धावा करण्यासाठी 45 चेंडू घेतले. जडेजाने आपल्या कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक 198 चेंडूत पूर्ण केले. भारताने पाच गड्यांच्या मोबदल्यात 315 धावा केल्या आहेत. सध्या जडेजाला पाठिंबा देण्यासाठी नाईट वॉचमन कुलदीप यादव आला आहे.
त्याआधी,भारताला 237 धावांवर चौथा धक्का बसला. रोहित शर्माच्या कर्णधारपदाचा डाव 131 धावांवर संपुष्टात आला. त्याने ही खेळी 196 चेंडूत 14 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने खेळली. त्याने रवींद्र जडेजासोबत 204 धावांची भागीदारी केली. याआधी यशस्वी जैस्वाल (10), शुभमन गिल (0) आणि रजत पाटीदार (5) यांच्या रूपाने टीम इंडियाला तीन धक्के बसले. भारताला 33 धावांवर तिसरा धक्का बसला. यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल यांच्यानंतर रजत पाटीदारही पॅव्हेलियनमध्ये परतला. वुडने यशस्वी आणि शुभमनला बाद केले, तर टॉम हार्टलीने रजतला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यशस्वी 10 धावा करून, शुभमन खाते न उघडता आणि रजत पाच धावा करून बाद झाले. भारताची ही फलंदाजी लाईन अननुभवी आहे.
IND vs ENG 3rd Test 1st day Live Score : पदार्पणाच्याच डावात सरफराजचे तूफानी अर्धशतक….
भारताचा फलंदाजीचा निर्णय…
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघात चार बदल करण्यात आल्याचे कर्णधाराने सांगितले. सरफराज आणि ध्रुव जुरेल आंतरराष्ट्रीय पदार्पण करत आहेत. या दोघांना श्रेयस अय्यर आणि केएस भरत यांच्याजागी संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर अक्षर आणि मुकेश कुमार यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराजचे पुनरागमन झाले आहे. जडेजा दुखापतीमुळे शेवटच्या कसोटीत खेळला नव्हता. त्याचबरोबर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचा हा 100 वा कसोटी सामना आहे.