रायपूर – भारतीय संघ आज (शुक्रवार) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यासाठी मैदानात उतरेल तेव्हा मालिका विजयाची संधी मिळवणार का हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या दोन संघात पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जात असून त्यात भारतीय संघ 2-1असा आघाडीवर आहे.
या सामन्यासाठीचे चित्र मात्र, वेगळे राहील. संघात दीपक चहरचा समावेश करण्यात आला आहे. तो मोठ्या कालावधीनंतर संघात पुनरागमन करत आहे. तसेच विश्वकरंडक स्पर्धेत अफलातून भरात असलेला श्रेयस अय्यरची या सामन्याद्वारे पुनरागमन करणार आहे. त्यामुळे भारताचेच पारडे या सामन्यात जड राहणार आहे. मात्र, असे असले तरीही त्यांना फलंदाजी, गोलंदाजी यांच्यासह क्षेत्ररक्षण व नेतृत्व या दोन गोष्टीतची कमालीची सुधारणा करावी लागणार आहे.
लक्षवेधी
– भारतीय संघ सर्वाधिक टी-२० विजयाच्या उंबरठ्यावर
– उर्वरीत दोन्ही सामन्यांसाठी दीपक चहरची निवड
– श्रेयस अय्यरही करणार संघात पुनरागमन
– स्टोनिससह मॅक्सवेलही मायदेशी
– कमकुवत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचे पारडे जड
यशस्वी जयस्वाल, इशान किशन, ऋतुराज गायकवाड यांनी शतकी तसेच अर्धशतकी खेळी या मालिकेत केलेल्या असल्या तरीही त्यात सातत्य राखलेले नाही. एका सामन्यात अर्धशतक तर नंतरच्या लढतीत शतकी खेळी करत ऋतूराजने अपेक्षा पूर्ण केल्या असल्या तरीही अद्याप भारताच्या या फलंदाजांनी म्हणावे तसे वर्चस्व राखलेले नाही. त्यातच संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आलेले असतानाही सूर्युकुमार यादवच्या खेळीत बेजबाबदारपणाच दिसत आहे. त्याला संपूर्ण विश्वकरंडक स्पर्धेत अपयश आले होते. त्याने या स्पर्धेत सगळे 11 सामने खेळताना केवळ 108 धावा केल्या असल्याने त्यालाच या मालिकेसाठी कर्णधार करण्यात आल्याने बीसीसीआयवर टीकेची झोड उठली आहे. तो धावांची विशी तसेच पस्तीशी पार करतो मात्र, त्याला मोठी खेळी करण्यात सातत्याने अपयश येत आहे.
या स्थितीत पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत असलेला रिंकू सिंग भारतीय फलंदाजीचा कणा बनला आहे. गोलंदाजीबाबत बोलायचे तर चहरच्या समावेशाने गोलंदाजी बळकट होणार आहे. मात्र, प्रसिध कृष्णा, मुकेश कुमार यांना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. त्यामानाने लेगस्पीन गोलंदाज रवी बिष्णोईने अपेक्षा वाढवल्या आहेत. आता हा चौथा सामना जिंकत भारत मालिका जिंकणार का याचे उत्तर लवकरच मिळेल.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ प्रमुख खेळाडू मायदेशी परतल्याने कमकुवत बनल्याचे चित्र होते. मात्र, ग्लेन मॅक्सवेल व कर्णधार मॅथ्यु वेडने जिद्दी खेळी करत भारतावरच दडपण राखण्यात यश मिळवले. मात्र, यातील ग्लेन मॅक्सवेल व मार्कस स्टोनिसही आता मायदेशी परतल्याने त्यांची बाजू खरोखरच कमकुवत बनली आहे. या स्थितीत कर्णधार वेड याच्यासह टीम डेव्हीड, जोस इंग्लिस यांच्यावरच खरी मदार राहणार आहे.
त्यांची गोलंदाजी या मालिकेत सातत्याने दुबळी ठरली आहे. नाथन एलिसकडून अपेक्षा आहेत मात्र, भारतीय खेळपट्ट्यांवर त्याने बळी घेताना धावाही भरपुर दिल्या आहेत. आता चौथ्या सामन्यात विजय मिळवत मालिकेत बरोबरी करण्याची संधी ते मिळवणार का हा प्रश्न आहे. जर त्यांनी मालिकेत बरोबरी केली तर पाचवा सामना मालिकेचा निर्णायक सामना ठरणार आहे.
रिंकू सिंगच्या कामगिरीकडे लक्ष
आयपीएल स्पर्धा गाजवणारा रिंकू सिंग या मालिकेत चांगलाच भरात आहे. मात्र, पहिले चार फलंदाज चांगले खेळले तर त्याला फलंदाजीची संधीच मिळत नाही असे दिसून आले आहे. त्यामुळे चौथ्या सामन्यासाठी नवा कर्णधार सूर्यकुमार यादव रिंकूला फलंदाजीच्या क्रमात बढती देणार का याकडे लक्ष लागले आहे. सूर्यकुमार वैयक्तीक कामगिरीतच नव्हे तर नेतृत्वातही कमी पडताना दिसत आहे. त्यामुळे रिंकूला आपल्या जागी फलंदाजीला पाठवत आपल्यावरील दडपण काहीसे दूर करण्याचा प्रयत्न करेल का असाही प्रश्न आहे.
दव व नाणेफेक निर्णायक ठरेल
भारतातील सध्याचे वातावरण पाहता संध्याकाळी मैदानावर पडणारे दव तसेच नाणेफेक निर्णायक ठरेल. दवामुळे गोलंदाजांना चेंडू व्यवस्थीत ग्रीप करणे कठीण जाते हा अनुभव आहे. तसेच त्यामुळे दुसऱ्या डावात फलंदाजी करणे सोपे ठरत आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकलेला कर्णधार पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
नवोदितांना मोठी संधी
या सामन्यानंतर बीसीसीआयची निवडसमिती आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करेल असे सांगितले जात आहे. त्यामुळे नियमित कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत संघात स्थान मिळालेल्या नवोदित खेळाडूंना निवड समितीला प्रभावीत करण्याची नामी संधी मिळालेली आहे.