पुणे – राज्यात दंगली होऊ शकतात, असे विधान करणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक झाली पाहिजे, अशी मागणी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केली आहे.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीयमंत्री राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी “दंगली होऊ शकतातश’, असे विधान केले आहे.
राज्यात अशी परिस्थिती आहे का? असा प्रश्न राणे यांना विचारला असता ते म्हणाले की, “प्रकाश आंबेडकर असो किंवा इतर कुणीही असो, जे कोणी दंगलीविषयी बोलत असतील, त्यांची पोलिसांनी दखल घ्यावी, त्यांची चौकशी करायला हवी. दंगलीची त्यांच्याकडे काय माहिती आहे ती घेऊन दंगल रोखण्यासाठी कारवाई करावी.’
मराठा आरक्षणाबाबत राणे म्हणाले, “मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये भांडणे लागू नयेत, या मताचा मी आहे. कुणाचे आरक्षण काढून मराठा समाजास आरक्षण देऊ नये. मी समितीचा अध्यक्ष असताना सामज़िक, आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण करून आरक्षण दिले होते. मराठा समाजातसुद्धा गरीब लोक आहेत. त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे.’