साखर उत्पादन कमी होणार; तरीही दर स्थिर राहणार
पुणे – सरलेल्या साखर वर्षात म्हणजे ऑक्टोबर 2018 ते सप्टेंबर 2019 या कालावधीत देशातील साखर कारखान्यांनी ठरविलेल्या उद्दिष्टापेक्षा कमी म्हणजे 37 लाख टन साखरेची निर्यात केली आहे. आगामी वर्षासाठी म्हणजे ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीत साखर कारखान्यांना 60 लाख टन साखर निर्यात करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, सरलेल्या वर्षात सरकारने 50 लाख टन साखर निर्यात करण्याचे उद्दिष्ट साखर कारखान्यांना दिले होते. त्यापैकी आतापर्यंत 37 लाख टन साखर निर्यात झाली आहे. मात्र सरकार केवळ दिशानिर्देशक उद्दिष्ट देत असते. एवढीच साखर निर्यात गेलीच पाहिजे असे बंधन साखर कारखान्यावर नाही. साखर कारखान्यांना व्यावसायिकदृष्टया परवडेल अशाच पद्धतीने निर्यात करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
या अगोदर अनेक वर्ष साखरेचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे साखरेचा बराच साठा देशात आहे. हा साठा ध्यानात घेऊन आणि यावर्षी होणारे उत्पादन ध्यानात घेऊन चालू वर्षांमध्ये सरकारने साखर कारखान्यांना 60 लाख टन साखर निर्यात करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. साखर कारखान्यांना त्यांच्या साखरेसाठी योग्य भाव मिळावा आणि त्यांना शेतकऱ्याचे देणे चुकते करता यावे याकरिता साखर कारखान्यांना निर्यात करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.
प्राप्त माहितीनुसार देशामध्ये सध्या 145 लाख टन साखरेचा साठा आहे. चालू साखर वर्षात आतापर्यंत साखरेच्या उत्पादनात 54 टक्क्यांची घट झालेली आहे. महाराष्ट्र आणि इतर ऊस उत्पादन करणाऱ्या राज्यांमध्ये विषम पर्जन्यमानामुळे साखरेच्या उत्पादनावर परिणाम होईल असे इस्मा साखर कारखानदारीच्या संघटनेने म्हटले आहे.
इस्माच्या म्हणण्यानुसार या वर्षी साखरेचे उत्पादन गेल्या वर्षाच्या तुलनेत 21 टक्क्यांनी कमी होऊन 260 लाख टन होणार आहे. साखरेचा जुना साठा व शक्य उत्पादन या बाबीचा सर्वसाधारण आढावा घेऊन साखरेच्या निर्यातीचे उद्दिष्ट ठरविले जाते. एकूण साखरेची परिस्थिती होता या वर्षी जरी साखरेचे उत्पादन कमी होणार असले तरी साखरेचे दर स्थिर राहण्याची शक्यता असल्याचे इस्माने म्हटले आहे.