पुणे – पुणे विभागातील पुणे,सातारा, सांगली आणि सोलापूर या तीन जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरी अजूनही अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे पुणे विभागात अजूनही टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
मे महिन्यात पुणे विभागात 51 टॅंकरने 62 गावांमधील 95 हजार 783 नागरिकांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. आता यामध्ये वाढ होऊन 155 टॅकरने 146 गावांमधील 3 लाख 4 हजार नागरिकांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. असाच पाऊस लांबल्यास टॅंकरच्या संख्येमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
यंदा मान्सूनचे काहीशा विलंबाने आगमन झाले. लांबलेल्या पावसामुळे त्याचा परिणाम शेतीसह पिण्याचा पाण्यावर सुध्दा झाला आहे. जुलैअखेरीस तसेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे धरणे जेमतेम भरली. मात्र, अजूनही बहुतांश भागात चांगला पाऊस झालेला नाही. त्यामुळे पाणी पातळी आणखीनच खोल गेली असून अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्यात मे महिन्यात टॅंकरची संख्या सर्वाधिक असते. मात्र, ऐन पावसाळ्यात अनेक गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पावसाकडे लक्ष लागले आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड, पुरंदर आणि शिरुर या पाच तालुक्यातील 36 गावांमधील 271 वाड्यावस्त्यांना 40 टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील खासगी 23 विहिरींचे प्रशासनाकडून अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये आंबेगाव तालुक्यातील 7 गावांमधील 44 वाड्यावस्त्यांवरील 22 हजार 57 नागरिकांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जुन्नरमधील 11 गावांमधील 16 हजार 118 नागरिकांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.
ऑगस्ट महिन्यातील स्थिती
जिल्हा टॅंकर गावे बाधित लोकसंख्या बाधित पशुधन
पुणे 40 36 98,224 0
सातारा 76 75 1,13,912 65,273
सांगली 29 17 661,980 4,993
सोलापूर 10 11 2,99,943 19,381