मुंबई: राज्यातील दुधाच्या किमतीत वाढ झाली आहे. शनिवारी दूध उत्पादक संघाची एक आढावा बैठक पार पडली. या बैठकीत दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूध उत्पादक संघाने गायीच्या दूध दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही दरवाढ उद्यापासून लागू करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी, जनावरांची झालेली हानी यासोबतच बटर उत्पादक आणि दूध पावडर उत्पादक यांनी वाढवलेले खरेदीचे दर या सर्वांचा विचार करता दूध उत्पादक संघाने दूधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शेतकऱ्यांकडन खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाला 30 रुपये प्रति लिटर इतका दर द्यावा लागतो त्यामुळे आर्थिक भार वाढत असल्याने दूध दरवाढ करण्यात आली.
मुंबईसह महाराष्ट्रात दुधाच्या दरात आता प्रति लिटर दोन रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. एकीकडे भाजीपाला महागलाय, कांदा महागला, इंधन दरात वाढ होत आहे त्याच दरम्यान आता दुधाच्या दरातही वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना काहीसा फटका बसणार हे निश्चित आहे. अमूलने मुंबई, महाराष्ट्रातच नाही तर दिल्ली-एनसीआर, पशअचिम बंगाल आणि गुजरात येथेही आपली दूध दरवाढ केली आहे.
गेल्या काही दिवसांत कांद्याचे दर प्रचंड वाढले होते. कांदा तब्बल 150 ते 200 रुपये किलो या दराने विक्री होत होता. यामुळे गृहिणींना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत होता. इतकंच नाही तर हॉटेल, रेस्टॉरंटमधून कांदा गायब झाल्याचं दिसून आलं. आता कुठे कांद्याचे दर कमी झाले असून लवकरच कांदा आणखी स्वस्त होईल असं चित्र दिसत आहे.