मुंंबई – राज्यातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ऑगस्ट महिना पूर्ण कोरडा गेल्यानंतर अनेक भागात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले आहे. गोकुळ अष्टमीनंतर राज्यातील अनेक भागात पावसाची संततधार सुरू आहे. राज्यातील अनेक धरणांच्या जलसाठ्यातही वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे.
यातच आता आज राज्यातील सातारा, रत्नागिरी, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. इतर भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला गेला आहे.
राज्यात १७ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुढील दोन दिवस अजून राज्यात सर्वत्र पाऊस आहे. त्यानंतर पावसाचा जोर कमी होऊ शकतो. मात्र पुन्हा १४ सप्टेंबरनंतर पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
तर, दुसरीकडे नाशिकमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. पंचवटी परिसर, सातपूर, इंदिरानगर, सिडको आणि नाशिक रोडमध्ये जनजीवन विस्काळीत झाले. अनेक ठिकाणी झाडे कोसळले आहेत, वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. याशिवाय अनेक भागातील वीजपुरवठा देखील खंडित झाला आहे.
गंगापूर धरण क्षेत्रात संततधार चालू असून पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच पुढील तीन ते चार दिवस पाऊस काय राहणार असल्याचा अंदाज आहे.