मुंबई – छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते की धर्मवीर होते या वादावरून राज्यातील राजकारण तापलेलं असताना आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्य रक्षक असल्याचे विधान केल्यानंतर सत्ताधारी भाजपा चांगलीच आक्रमक झाली होती. यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सावरकर आणि गोळवलकर यांचा संभाजी महाराजांबाबतचा दृष्टिकोन काय होता हे सांगितलं आहे. सावरकर आणि गोळवलकर यांच्या दृष्टीने संभाजी महाराज स्त्रीलंपट आणि व्यसनाधीन होते असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे.
आपल्या ट्विटमध्ये आव्हाड म्हणतात,”सावरकरांनी व माधव गोळवलकरांनी छत्रपती संभाजी ह्यांच्या बद्दल काय लिहून ठेवले ते वाचा ह्या शूर विरास बदनाम करण्याचे काम एका वर्गाकडून अनेकवेळा झाले.सावरकर आणि गोळवळकरांच्या दृष्टींनी संभाजी राजे हे स्त्रीलंपट आणि व्यसनाधीन होते कोणी बोलेल ह्याच्यावर ?” असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित करत पुस्तकांच्या पानाचे काही फोटो देखील यावेळी शेअर केले आहेत.
“शंभू राजे स्वराज्य रक्षक आणि धर्म रक्षकही… जे स्वराज्य शिवाजी महाराजांनी रयतेसाठी निर्माण केले त्याचे रक्षण करण्याचे काम शंभू राजेंनी केले त्यांना धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म सगळ्यांना सामावून घेणारा मराठा धर्म अभिप्रेत होता. त्यामुळे स्वराज्य आणि धर्म बाजूला कसे काढता येतील” असही आव्हाड यावेळी म्हणाले.
शंभू राजे स्वराज्य रक्षक आणि धर्म रक्षक हि
जे स्वराज्य शिवाजी महाराजांनी रयते साठी निर्माण केले त्याचे रक्षण करण्याचे काम शंभू राजेंनी केले त्यांना धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म सगळ्यांना सामावून घेणारा मराठा धर्म अभिप्रेत होता त्या मुळे स्वराज्य आणि धर्म बाजूला कसे काढता येतील— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 1, 2023
अजित पवार काय म्हणाले होते
नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजित पवार मुख्यमंत्री शिंदेंना उत्तर देताना चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी पवार यांनी शिंदेंना मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदाऱ्यांची आठवण करुन दिली. तसेच, शिंदे-फडणवीस सरकारने हिवाळी अधिवेशनात नुसत्या घोषणांचा पाऊस पाडून महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोपही अजित पवार यांनी केली. यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा पाठही शिकवला. तसेच, छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते, ते स्वराज्यरक्षक होते, असेही ठणकावून सांगितले होते.