कोल्हापूर- कोल्हापूर विमानतळ, करवीर एमआयडीसी, डेस्टिनेशन कोल्हापूर, राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरण यासारख्या नव्या प्रकल्पांवर प्रशासकीय यंत्रणा वेगात काम करत असून येत्या चार वर्षात कोल्हापूर हे पुण्या-मुंबईबरोबरच व्यापार उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र बनेल, असा विश्वास कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
यावर्षी 15 ते 18 एप्रिल या कालावधीत येथील शाहूपुरी जिमखाना मैदान येथे व्हायब्रंट महाएक्सपो 2022 या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माहितीपत्रकाचे अनावरण प्रसंगी पालकमंत्री पाटील बोलत होते.
कोल्हापूर हे आता विकसित होत असून पुण्या-मुंबईपाठोपाठ लोक आता कोल्हापूरला प्राधान्य देत आहेत. कोल्हापूरला चालना देण्यासाठी आपण सर्वच घटकांनी व उद्योजकांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक असल्याचे सांगून कोल्हापूरच्या जवळ कोकण व गोवा आहे याठिकाणी आपला भाजीपाला व अन्य उत्पादन जाण्यासाठी व्यापाऱ्यांनी प्रयत्न करूया, असे सांगितले.
कोल्हापूरमधून सध्या तीन विमाने उड्डाण करतात. करोनामुळे अडचणी आहेत, नाईट लॅंडिंगची तयारी केली जात आहे.कोल्हापूर मुंबई उडान योजनेंतर्गत कोल्हापूर मुंबई विमानसेवा लवकरच सुरळीत होईल. विस्तारीकरणासाठी अजून 64 एकर जागा आवश्यक आहे 1000 च्या आसपास मालक आहेत त्यांच्याशी बोलून त्यांना इतर पर्यायी जागा देऊन जागेचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही पाटील यांनी सांगितले.