लखनौ – केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मंगळवारी सायंकाळी चार महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर आला. संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील तो मुख्य आरोपी आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ पीठाने मागील आठवड्यात आशिषला जामीन मंजूर केला. त्यानंतर जामिनाशी संबंधित औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्याने आशिषचा तुरुंगाबाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला. उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीत मागील वर्षी 3 ऑक्टोबरला आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना एका वाहनाने चिरडले.
त्यामध्ये चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. शेतकऱ्यांना चिरडणारे वाहन आशिषचे असल्याची माहिती पुढे आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. त्यानंतर आशिषला अटक करण्यात आली. मात्र, तेवढ्यावर समाधान न मानता शेतकरी संघटना आणि विरोधकांनी आशिषच्या वडिलांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी लावून धरली. मात्र, ती मागणी मान्य झाली नाही.
सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला सामोऱ्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी प्रकरण हाही प्रचाराचा एक मुद्दा बनला आहे. अशात आशिषची तुरुंगातून सुटका झाली आहे. त्यामुळे संबंधित मुद्द्यावरून प्रचार आणखीच तापण्याची शक्यता आहे.