मुंबई – उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातल्या गावामध्ये दोन आठवड्यांपूर्वी सामूहिक बलात्कार झालेल्या 19 वर्षीय पीडित महिलेचा( बुधवारी दि . ३० सप्टेंबर ) दिल्लीतील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर मध्यरात्री पोलिसांकडून पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना यूपी पोलिसांनी धक्काबुक्की केली. तर पीडितेच्या कुटुंबाला घरातच डांबून मीडियाशीही बोलू देत नाही. प्रशासनाकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप कुटुंबीय करत आहेत.त्यामुळे उत्तर प्रदेशचं योगी सरकार आणि यूपी पोलीस नेमकं काय लपवत आहेत, असा प्रश्न सर्वच राजकीय पक्षांकडून उपस्थित केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते व आमदार प्रताप सरनाईक यांनी हाथरस प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करुन मुंबई पोलिसांना तपासासाठी उत्तर प्रदेशला पाठवावं, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे ट्विटरव्दारे केली आहे.
सरनाईक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “देशाला संतप्त करणाऱ्या, मानवतेला काळीमा फासणाऱ्या हाथरस घटनेची पारदर्शक चौकशी न करता योगी सरकारने अत्यंत बेजबादारपणे, अमानवी पद्धतीने ती हाताळल्याचे दिसतेय. मुंबईत यावर गुन्हा नोंदवून मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावे” अशी गृहमंत्री अनिल देखमुख यांना मी विनंती करतो.
दरम्यान,हाथरस प्रकरणावर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच यावरून राज्यातील योगी सरकारवर निशाणा साधला जात आहे.