नवी दिल्ली : कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री आणि वरिष्ठ भाजपा नेते के एस ईश्वरप्पा यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यांनी देशातील सर्व मुस्लिम आणि ख्रिश्चन भविष्यात आरएसएससोबत जोडले जातील असा दावा केला आहे. त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे यांनी काँग्रेस आमदार जमीर अहमद खान यांना तो दिवस दूर नाही जेव्हा प्रत्येकाला आरएसएसला ‘आपली आरएसएस’ म्हणून मान्यता द्यावी लागेल असे म्हटले. यावर काँग्रेसच्या आमदारांनी आक्षेप घेतल्यानंतर नेते के एस ईश्वरप्पा यांनी हे विधान केलं.
“आपण कोणत्या विचारसरणीवर विश्वास ठेवतो यापेक्षा एकमेकांचा आदर करणं जास्त महत्वाचं आहे. आधी आपले वैयक्तिक संबंध येतात आणि नंतर पक्षांमधील मतभेद…भाजपा, आरएसएस, काँग्रेस आणि इतर,” असे सिद्धरमय्या यांनी म्हटले. विरोधी पक्षनेते सिद्धरमय्या यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा मांडत असताना आरएसएसचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी भाजपाच्या काही नेते आणि मंत्र्यांसोबत असलेल्या मैत्रीचाही उल्लेख केला.
यावेळी अध्यक्षांनी सिद्धरमय्या यांना,”तुम्हाला आरएसएसची भीती का वाटत आहे? असे विचारले. यावर सिद्धरमय्या उत्तर देत असताना काँग्रेस आमदार जमीर अहमद उभे राहिले आणि आक्षेप घेत अध्यक्षांना विचारलं की, “तुम्ही अध्यक्ष म्हणून त्या खुर्चीवर बसले असताना ‘आपली आरएसएस’ म्हणत आहात?”
यावर उत्तर देताना ते म्हणाले की, “हो नक्कीच ही ‘आपली आरएसएस’ आहे, अजून काय बोलणार? आता किंवा कधीतरी तुम्हाला ही आपली आसएसएस असे म्हणावेच लागणार आहे”. यावर काँग्रेस आमदारांनी तो दिवस येणार नाही असे म्हटले. महसूल मंत्री आर अशोक यांनी यावेळी उत्तर दिले की, “तुम्हाला आवडो अथवा नाही…पण सर्व महत्वाच्या पदांवर आरएसएसमधून आलेले आहेत. काँग्रेस आमदार याला देशाचं दुर्देव म्हणतात”. यानंतर ईश्वरप्पा उभे राहिले आणि म्हणाले की, “या देशातील सर्व मुस्लिम आणि ख्रिश्चन आज किंवा भविष्याक कधी ना कधी आरएसएससोबत जोडले जातील, यामध्ये काही शंका नाही”. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसच्या आमदारांनी जोरदार आक्षेप घेतला.