निखील जगताप
बेलसर – पुरंदर तालुक्यामध्ये रब्बी हंगामामध्ये जवळपास…हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती. बहुतांशी कांदा सद्यस्थितीला बाजारात गेला आहे; परंतु मागास कांदा अजूनही शेतात आहे. बाजारात गेलेल्या कांद्याच्या भावात अलीकडील महिन्याभरात कमालीची घसरण जाणवली आहे. अजूनही कांद्याच्या भावात संपूर्ण राज्यभरात सध्या मोठी घसरण सुरू आहे. राज्यभरात उन्हाळी कांद्याची मोठी आवक बाजारात सुरू आहे त्यामुळे भाव मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत.
चालू हंगामात कांद्यानी त्यासोबतच शेतकऱ्यांनी अस्मानी आणि सुलतानी संकटांना तोंड दिले आहे. प्रामुख्याने कांदा पिकावरील पीळ रोग ही मोठी समस्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावली होती. त्यामुळे कांद्याचे उत्पन्न किती निघेल याबद्दल साशंकता निर्माण झाली होती; परंतु या संकटांचा सामना करूनही समोर शेतकऱ्यांना निराशेचा सामना करावयास लागला आहे. रोगामुळे कांदा पिकावर अधिकच्या फवारण्या घ्याव्या लागल्या होत्या. त्यामुळे कांद्याचा उत्पादन खर्च त्या पटीने वाढला आहे. परंतु भावात झालेली घसरण यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (दि. 24) कांद्याची 12801 क्विंटल आवक झाली होती प्रामुख्याने कांदास किमान 500 व कमाल 1350 रुपये बाजार भाव मिळाला आहे. बुधवारी (दि.23) किंचितशी बाजार भावात वाढ झाली आहे; परंतु मागील महिन्याभराचा विचार करता बाजारभावात बहुसंख्य घसरण जाणवली आहे. यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याने राज्यामध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती.
त्यामुळे कांद्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात मिळाले आहे. त्यामुळे बाजारामध्ये आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यासोबतच रशिया आणि युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीमध्ये निर्यात मोठ्या प्रमाणावर घटली आहे त्यामुळे बाजारात कांद्याची आवक वाढली आहे परंतु कांद्याची मागणी ही कमी असल्याने दरात मोठी घसरण जाणवत आहे.
33 वरून 10 ते 12 रुपये किलो
मागील महिनाभरात 33 च्या जवळपास विकला जाणारा कांदा आज अक्षरशः 10 ते 12 किलो रुपयांनी विकला जात आहे. त्यामुळे पुढील काळात कांद्याचे बाजार भाव अजून घसरतील या भीतीने शेतकरी, व्यापारी चिंतेत आहे. शेतकऱ्यांकडे कांदा साठवून ठेवण्यासाठी उपलब्ध साधनसामुग्री नसल्याने शेतकरी काढणीनंतर कांदा लगेच विक्रीला आणतो. त्यामुळे बाजारात आवक वाढते. पाणी मागणी कमी असल्याने बाजार भावात घसरण होते.