मंत्री जितेंद्र आव्हाड यांची टीका ः लोकशाहीत सर्वजण समान
वाघळवाडी-ते राजे महाराज आहेत आणि आम्ही मात्र सामान्य प्रजेतली माणसं आहोत. त्यामुळे ते आम्हाला ठोकू शकतात, अशी उपरोधिक टिका गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माजी खासदार उदयनराजे व त्यांच्या मराठा क्रांती मोर्चाच्या समर्थकांवर केली. तसेच उदयरनराजे यांच्या डोक्यात अजूनही सरंजामशाहीच आहे. घटनेनुसार लोकशाहीत सर्वजन समान आहेत हे समजून घेण्याच्या मूडमध्ये ते नाहीत, अशी टीकाही केली.
करंजेपूल (ता. बारामती) येथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नितिन यादव यांच्या निवासस्थानी आव्हाड यांनी सदिच्छा भेट दिली. सुब्रमण्यम स्वामी, योगेश सोमण यांच्यासह उदयनराजे व त्यांच्या समर्थकांचा आव्हाड यांनी शेलक्या शब्दांत समाचार घेतला. तसेच गृहनिर्माण व कर्जमुक्तीत सरकार गंभीरपणे काम करणार असल्याचे आश्वासनही दिले.
उदयनराजे यांना आपण लोकशाहीपूर्ण जगात आहोत हे अजूनही लक्षात येत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेनुसार सर्वजण समान आहेत. भाजपाची महाराजांबद्दलची असूया अजून संपत नाही. कालच एका भाजपाच्या आमदाराने महाराजांची उंची मोदींमुळे आणखीन वाढली असे वक्तव्य केले. भाजपाने याबाबत खुलासा करावा, असे आव्हानही आव्हाड यांनी दिले. भाजप गोयल प्रकरणाशी संबंध नाही म्हणते; तर प्रकाश जावडेकरांनी पुस्तक मागे घेण्याची घोषणा का केली?
सरकार कर्जमाफीमध्ये गंभीरपणे उर्वरीत सर्व शेतकऱ्यांना न्याय देणार आहे. दोन लाखांच्या वरील आणि नियमित कर्जदारांना मदत होणार आहे. तसेच सीएए, एनआरसी हा बहुजनांविरूद्धचा डाव आहे. वडील-आजोबांचे प्रमाणपत्र किंवा खापरपणजोंबाची स्मशानभूमी आम्हाला सांगता येणार नाही. तुलनेने मुस्लिमांचा खानदानी कबरखाना असतो, ख्रिश्चनाचं रेकॉर्ड आहे. भटक्या विमुक्तांकडे, बहुजनांकडे काय रेकॉर्ड आहे? जमीन नाही किंवा वास्तव्याचा दाखला नाही. भाजपा असा जातीयवाद वाढवत आहे. माणसाला माणूस मानणार का नाही? असा सवाल त्यांनी केला.
घटनेवर चर्चेवेळी प्रास्ताविका सुरू करताना देवाचे नाव टाकून सुरू करण्याबाबत डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी विरोध केला. जिजस, अल्ला, बुद्ध अशीही नावे टाकायची का? असा सवाल केला. त्यानंतर “वुई द पिपल…’ अशी सुरूवात केली. बहुसंख्यांकवादावर दादागिरी करता येत नाही. पण अजूनही भाजपाला समाजव्यवस्था समजत नाही. ते पुन्हा जातीयवाद सुरू करत आहेत. इंग्रज काळात फासेपारध्यांसाठी सेटलमेंट कॅम्प होता आता त्यांच्यासाठी डिटेंशन कॅम्प काढला जात आहे. आसाममध्ये मुसलमानांना टार्गेट करायला गेले आणि 19 लाखांपैकी 14 लाख हिंदू निघाले. त्यामुळे ते फसले आहेत. स्थानिक हिंदू आणि बाहेरचे यांच्यात वाद लागलाय. माणूस म्हणून जगू द्या सगळ्यांना, असा आव्हाडांनी सल्ला दिला.
- बांधकाम उद्योगाला सुगीचे दिवस आणणार
मंदीमुळे बांधकाम उद्योगही अडचणीत आहे. या उद्योगात बिल्डरसोबत 268 प्रकारचे छोटे-मोठे व्यवसाय जगतात. वेगवेगळ्या प्रयोगातून बिल्डर जिवंत ठेवून गरीबांना परवडतील अशी घरे मिळवून द्यावी लागतील. या इंडस्ट्रीला तीन महिन्यांत सुगीचे दिवस आणण्यासाठीच शरद पवार यांनी मला गृहनिर्माण दिले आहे. गरिबांना घरासाठी मदत होणार असेल तर आक्रमकपणे या इंडस्ट्रीला जिवंत करण्यासाठी मोठ्या बॅंकांशी बोलतोय, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.