पिंपरी -वेडीवाकडी आणि इतरांच्या जिवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने रिक्षा चालवत असलेल्या रिक्षा चालकाला महिला पोलीस कर्मचाऱ्याने रिक्षा व्यवस्थित चालवण्यास सांगितले. त्यावरून रिक्षा चालकाने आणि त्याच्या दोन साथीदारांनी पोलीस महिलेसोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. ही घटना मंगळवारी (दि. 22) रात्री सव्वानऊ वाजता भारतमाता चौक, मोशी येथे घडली. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
विश्वदीप भरत मादलापुरे (वय 19), अभिषेक बाळासाहेब पोळ (वय 19), सुनील शिवाजी कसबे (वय 20, तिघे रा. बनकरवस्ती, मोशी) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीं रिक्षा (एमएच 14 एचएम 5771 ) वेडीवाकडी आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा रितीने चालवत होते.
त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपींना रिक्षा व्यवस्थित चालवण्यास सांगितले. पोलिसांचे न ऐकता आरोपी पुढे निघून गेले. पुढे भारतमाता चौकात सिग्नलवर रिक्षा थांबली असता फिर्यादी पोलीस महिला आरोपींना’मी पोलीस आहे. रिक्षा व्यवस्थित चालवा’ असे सांगत असताना आरोपींनी फिर्यादी यांचा हात पकडून त्यांचा विनयभंग केला. तसेच फिर्यादी पोलीस महिलेला रिक्षात ओढून रिक्षा तशीच पुढे पळविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.