सातारा – साताऱ्यात मागील महिन्यापासून उष्णता वाढलेली असताना शुक्रवारी जणू उष्णतेची लाटच निर्माण झाल्याचे जाणवून आले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उष्णतेच्या पाऱ्याने चाळीशी गाठली. अशावेळी रस्त्यावरील डांबर अक्षरश: वितळून निघाले तर दुचाकीचालकांचे कपडे गरम झाले होते. त्यामुळे दुपारच्या सुमारास रस्त्यावरील वर्दळ चांगलीच घटली होती तर परिसरातील रसवंतीगृहे, आईसक्रिम पार्लर दुकानांमध्ये चांगलीच गर्दी झाल्याचे दिसून आले.
शुक्रवारी निर्माण झालेल्या लाटेमुळे निवासी, व्यावसायिक, हॉकर्स, रिक्षाचालक हे उकाड्याने चांगलेच हैराण झाल्याचे दिसून आले. शुक्रवारी दुपारच्या सुमारास सूर्य अक्षरश: आग ओकत होता. त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट निर्माण झाला होता. दरम्यान, यंदाचा मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यास अजुन सात दिवसांचा अवधी बाकी आहे. तसेच येत्या काही दिवसांमध्ये तापमानामध्ये उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे मत हवामान तज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी आणि विशेषत: लहान मुलांच्या प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत कामाशिवाय घर अथवा कार्यालयाच्या बाहेर पडू नये. लहान मुलांनी दुपारच्या वेळेत मैदानांवर खेळू नये. विश्रांतीसाठी झाडांचा आधार घ्यावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.