नवी दिल्ली : येत्या दहा दिवसांत देशांत आणखी पाच हजार ठिकाणी शाहीनबागसारखी निदर्शने सुरू होतील, असे मत भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी व्यक्त केले.
दक्षिण दिल्लीतील शाहीनबाग येथे सुधारीत नागरिकत्व कायदा (का) आणि राष्ट्रीय नागरिकत्व सुची (एनआरसी) यांच्या विरोधात सुरू असणाऱ्या महिलांच्या निदर्शनांना आझाद यांनी भेट देऊन पाठींबा व्यक्त केला. त्यावेळी ते बोलत होते.
का हा काळा कायदा असून धर्माच्या नावाववर देशात फुट पाडणारा आहे. या निदर्शनात सहभागी झालेल्यांचे मी अभिनंदन करतो कारण ही केवळ राजकीय निदर्शने नसून आपण देशाची राज्यघटना आणि एकतेचे रक्षण करत आहोत.
महिनाभरापेक्षा अधिक काळ सातत्याने आंदोलन करणाऱ्या या महिलांपुढे ते म्हणाले, या महिला निदर्शकांच्या इच्छाशक्तीला कडाक्याची विक्रमी थंडीही रोखू शकली नाही. आझाद यांच्या आगमनावेळी फैझ अहमद यांच्या हम देखेंगे या कवितेने वातावरणात उत्साह भरला गेला. हातात राज्य घटना घेऊन आझाद म्हणाले, मी वचन देतो, येत्या दहा दिवसांत देशांत पाच हजार शाहीनबाग तयार होतील.