लोणी काळभोर -कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील जावयाकडे पुण्याहून आलेली 45 वर्षीय महिला करोनाबाधित असल्याचे चाचणी नंतर स्पष्ट झाले आहे. कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींच्या हद्दीत गेल्या चार दिवसांत करोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. एकूण तीन महिला करोनाबाधित असल्याचे आढळून आल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी दिलेल्या माहिती नुसार ही महिला लोहियानगर (भवानी पेठ) पुणे येथील रहिवासी आहे. ती 2 मे रोजी कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कदमवस्ती येथे आपल्या जावयाकडे आली होती. तिच्या छातीत दुखू लागलेने जावयांनी तिला जवळच्या खाणगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे रक्त तपासणी व एक्सरे काढून इतर उपचार केले.
संशय आलेने तिला हडपसर येथील रूग्णालयात पाठवण्यात आले. तेथील खर्च न परवडल्याने ती गोळीबार मैदान, पुणे येथील शासकीय रूग्णालयात गेली. तेथे तपासणी केली असता तिला करोनाची लागण झाली
असल्याचे निष्पन्न झाले. तसा अहवाल काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास प्राप्त होताच डॉ. जाधव यांनी आरोग्य कर्मचारी यांचेकडून परिसराचे निर्जंतुकीकरण केले. या महिलेच्या दोन्ही जावयांना तपासणीसाठी पुण्यातील रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.
23 जणांचा अहवाल निगेटिव्ह
गुरुवारी (30 एप्रिल) येथील 70 वर्षीय वृद्ध महिला करोनामुळे मृृत्यूमुखी पडली आहे. तिच्या दोन नातेवाईक महिलांना करोनाची बाधा झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या संपर्कात आलेल्या 25 पैकी 23 जणांचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असला तरी संपर्कात आलेल्या आणखी पंधरा जणांना करोना टेस्टसाठी पुण्यातील शासकीय रुग्णालयात रविवारी (3 मे) पाठवले आहे.
परिसरात बाधितांची संख्या आठवर
कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींच्या हद्दीतील एका मोठ्या रुग्णालयात उरुळी कांचन येथील एक 47 वर्षीय महिला व तिच्यावर उपचार करणारे रुग्नालयातील एक डॉक्टर एक नर्स व एक तंत्रज्ञ असे 4 जण करोना बाधित असल्याचे सुरुवातीला आढळून आले होते. कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील परीसरातील आणखी तीन रुग्ण एकाचवेळी करोना बाधित असल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींच्या हद्दीशी संबंध असणारे एकूण आठ बाधित रुग्ण झाले असून त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे.
पुणे सील असतानाही पोहाचलीच कशी?
पुणे शहराचा बहुतांश भाग सील करण्यात आला आहे. तरीही ही महिला एवढ्या मोठ्या बंदोबस्ताचा अडथळा पार करून कदमवाकवस्ती येथे पोहोचलीच कशी? हा सवाल उपस्थित होत आहे. या कामासाठी नियुक्त करण्यात आलेले पोलीस प्रशासन आपल्या कामात हलगर्जीपणा तर दाखवत नाही ना, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे.