नगर (प्रतिनिधी) – महावितरणच्या सावळ्या गोंधळामुळे संपूर्ण नगर शहरात वीजेचा लपंडाव सुरु आहे. कोणतेही नियोजन नसल्याने वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात त्याचा नागरिकांना त्रास सहन करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा सज्जड इशारा आमदार संग्राम जगताप यांनी मुख्य कार्यकारी अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांना दिला आहे.
नगर शहर व उपनगराचा वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठया संदर्भात आमदार संग्राम जगताप यांनी महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सांगळे व अधिकारी यांना धारेवर धरले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, घनश्याम शेलार, माजी नगरसेवक विजय गव्हाळे, युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे व अधिकारी वर्ग उपस्थित होता.
जगताप म्हणाले की, वीज पुरवठा खंडीत करण्याच्या वेळेस नागरिकांना पूर्व सुचना देणे गरजेचे आहे. महावितरणचे दुरूस्तीचे काम करावयाचे असल्याचे वृत्तपत्राच्या माध्यमातून नागरिकांना पूर्व सुचना द्या. लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक शासकीय व खाजगी कार्यालयातील कामकाजात नागरिक घरात बसून संगणकाद्वारे करित आहेत. तसेच अनेक विद्यार्थी आपले क्लास तास ऑनलाईन पध्दतीने सुरू आहे. वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. उद्या दुपार पर्यत शहराचा वीज पुरवठा संदर्भात सर्व लेखी माहिती देण्यात यावी.