जळोची (वार्ताहर) – बारामती शहरात विनाकारण गर्दी करणारे व मास्क न लावता फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलीस व नगरपालिका प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत सोमवारी (दि. 29) पहिल्याच दिवशी मास्क न वापरता फिरणाऱ्या 53 नागरिकांवर कारवाई करत तब्बल 10 हजार 600 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
शहरात करोनाचा रुग्ण सापडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेवरून “बारामती पॅटर्न’ यशस्वीरित्या राबविण्यात आला. शहर करोनामुक्त झाल्यानंतर बारामतीकरांची अडचण होऊ नये म्हणून, काही नियम व अटींना अधिन राहून बाजारपेठा खुल्या करण्यात आल्या. मात्र नागरिक मास्क न लावत ठिकठिकाणी विनाकारण गर्दी करून थांबताना दिसून येत आहेत. याला आळा घालण्यासाठी कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याने त्याचे स्वागत केले जात आहे. तर व्यापारी व काही दुकानदार ग्राहकांना सॅनीटायझर देत नसल्याचे ग्राहकांच्या तक्रारी असल्याने आता अशा दुकानदार आणि व्यापाऱ्यांवर प्रशासन कारवाई करणार का, हे पहावे लागेल.
शहरात करोनाचा प्रसार होवू नये यासाठी मास्क महत्त्वाचे आहे. पण नागरिक ते घालत नसल्याने मास्क विना आढळून आलेल्या नागरिकांवर 200 रुपये दंडाची कारवाई करण्यात येत आहे.
– राजेंद्र सोनवणे, आरोग्य निरीक्षक, बारामती नगरपालिका